शेवगाव : ‘तो’ तांदूळ तब्बल बारा लाख रूपयांचा ! रेशनच्या धान्याचा काळाबाजार | पुढारी

शेवगाव : ‘तो’ तांदूळ तब्बल बारा लाख रूपयांचा ! रेशनच्या धान्याचा काळाबाजार

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  काळ्या बाजारात विक्रीसाठी चालविलेला तब्बल 12 लाख रुपयांचा 45 हजार किलो तांदूळ हस्तगत करण्यात आला असून, याबाबत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ज्याच्या घरात साठा होता, तो आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा पोलिसांनी पारदर्शी तपास करून त्यांना जनतेसमोर उघड करावे, अशी मागणी तालुक्यातून होत आहे. स्वस्त धान्य दुकानातील शासनाचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना शनिवारी पोलिसांनी पकडला. त्याची रात्री मोजदाद झाल्यानंतर प्रक्षिणार्थी तहसीलदार राहुल पोपट गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भीमा मारुती गायकवाड (रा.रेणुकानगर, शेवगाव), ट्रक चालक बाळू सूर्यभान कोकाटे (रा.झापेवाडी ता. शिरूर कासार जि.बीड), क्लिनर प्रवीण अशोक ढोले (रा. गाडेवाडी ता. पाथर्डी, जि.नगर) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, भीमा गायकवाड पसार झाला आहे.

शनिवारी पहाटे गांधीधाम (गुजरात) येथे काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्रीसाठी स्वस्त धान्य दुकानातील वेगवेगळ्या वजनाच्या 8 लाख 96 हजार 280 रुपये किंमतीचा 742 गोण्या तांदूळ घेऊन जात असलेली 14 टायरची ट्रक पोलिसांनी शहरातील नेवासा रोडवर असणार्‍या धर्मात्मा पेट्रोलपंपावर पकडली. याबाबत चौकशी केली असता वाहन चालकाने हा तांदूळ धनलक्ष्मी राईस मिल, कॉम्पलेक्स नियर लसरा मार्केट, दुर्गा चौक, गोंदिया असे खोटे बिल दिले. मात्र, पोलिसांना शंका निर्माण झाल्याने त्यांनी अधिक चौकशी केली असता, शुक्रवारी (दि. 23) सांयकाळी 5 ते 11.30 पर्यंत हा तांदूळ रेणुकानगर येथे भरून तो गांधीधाम येथे काळ्याबाजारात जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी रेणुकानगर मधील भीमा गायकवाड याच्या घराची झडती घेतली. तेथे 2 लाख 67 हजार 660 रुपये किमतीचा 239 गोण्या तांदूळ हस्तगत केला. रात्री उशिरापर्यंत झालेल्या मोजदादीत एकूण 981 गोण्यातील 11 लाख 63 हजार 940 रुपये किमंतीचा 44 हजार 814 किलो तांदूळ हस्तगत करण्यात आला आहे.

या शासकीय धान्यांचा साठा करून तो काळ्याबाजारात विक्री करणारे नेमकी कोण कोण आहेत? आतापर्यंत त्यांनी किती धान्य विकले? यात अधिकारी, कर्मचारी अथवा राजकीय पुढार्‍यांचा हात आहे काय? याचा पोलिसांनी पारदर्शी तपास करावा, अशी मागणी होत आहे. मागील इतिहास पाहता असे प्रकरण दडपण्यासाठी किंवा कारवाईची तीव्रता कमी करण्यासाठी अनेकांचा हस्तक्षेप होणार आहे. याबाबत पोलिसांनी सतर्क राहावे. कुणाच्याही दबावाला अथवा अमिषाला बळी न पडता गरीबांचे धान्य लुटणार्‍या आरोपींना जनतेसमोर उघडे करावे. अन्यथा यात पोलिसांवरच आरोप होण्याची शक्यता आहे.

Back to top button