

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाटेवगाव व खंडाळा येथे आौद्योगित वसाहत उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने या वसाहतीला तत्त्वत: मान्यता दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी तत्त्कालीन व आताच्या राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
त्यामुळे बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात औद्योगिक वसाहती व्हावी, यासाठी आमदार पवार यांनी तत्कालिन मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासून तसा अहवाल उच्चाधिकार समितीने सादर करावा, असे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.
दरम्यान, कर्जत व जामखेड दोन्ही तालुक्यांत योग्य ठिकाणाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर सर्व बाबींचा विचार करून दोन्ही तालुक्यांना मध्यवर्ती ठरणारी कर्जत तालुक्यातील पाटेगाव व खंडाळा येथील जागेची निवड करण्यात आली आहे. पाटेगाव व खंडाळा येथील क्षेत्राची सहमुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली भू-निवड समितीने पाहणी केली.
त्यानंतर सदर क्षेत्राचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले. 14 जुलै 2022 च्या 143 व्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पाटेगाव व खंडाळा येथील 458.72 हेक्टर क्षेत्र महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास अधिनियम 1961 च्या तरतुदीनुसार लागू करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली.
परंतु, अजूनही या क्षेत्राची अधिसूचना झालेली नाही. त्यामुळे ही बाब आमदार पवार यांनी विधिमंडळाच्या चालू हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने उद्योग मंत्र्यांनी त्यांच्या निवेदनात कर्जत तालुक्यातील पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याची बाब मान्य केली.
कर्जत तालुक्यातील पाटेगाव व खंडाळा येथील 458.72 हेक्टर क्षेत्रास उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली असून, औद्योगिक विकास अधिनियमाच्या तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, तसेच सदर औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूकदारांनी भूखंडाची मागणी केल्यास पास थ्रू पद्धतीने भूखंड उपलब्ध करून देण्याची तजविज ठेवली आहे, असे विधिमंडळाच्या पटलासमोर निवेदनाद्वारे जाहीर केले. त्यामुळे लवकरच खंडाळा व पाटेगाव येथे औद्योगिक क्षेत्र विकसित होईल.
आमदार पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून नगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच श्रीगोंदा ते जामखेड हा देखील महामार्ग आमदार पवार यांनी मंजूर करून आणला आणि या दोन्ही महामार्गांचा फायदा हा आता या एमआयडीसीत प्रकल्प आणण्यासाठी होणार आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी आणण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला. यासाठी महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अदिती तटकरे, सर्व अधिकारी आणि विद्यमान मंत्री उदय सामंत यांचे सहकार्य लाभले.
-आमदार रोहित पवार