संगमनेर : नेमके हे मंत्री राज्याचे की दोन तीन तालुक्याचे : आ थोरात | पुढारी

संगमनेर : नेमके हे मंत्री राज्याचे की दोन तीन तालुक्याचे : आ थोरात

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :   आपण सर्वांना बरोबर घेत तालुक्याच्या विकासाची घोडदौड कायम राखली आहे मात्र संगमनेरचा चांगला सुरू असलेला विकास काहींना पहावत नाही म्हणून ते संगमनेरला कायम त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. नेमके ते मंत्री राज्याचे आहेत की दोन-तीन तालुक्याचे आहेत हेच कळत नाही.  अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.  बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार डॉ सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर इंद्रजीत थोरात रणजीत देशमुख, शंकरराव खेमनर, डॉ जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे , संपत राव डोंगरे, रामदास वाघ, मिलिंदकानवडे, संतोष हासे , नानासाहेब शिंदे,गणपतराव सांगळे, सुरेश थोरात ,सोमेश्वर दिवटे, नवनाथ अरगडे सुभाष सांगळे आदी उपस्थित होते. आ थोरात म्हणाले की, ग्रामपंचायत हा राजकारणाचा पाया आहे. आपण कधीही ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेतला नाही. तरीही तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठे यश मिळवले आहे. निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. मात्र निवडणुकीनंतर सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आले पाहिजे.

आपल्या संगमनेर तालुक्याची ही परंपरा कायम जपली पाहिजे असे आवाहन करून ते म्हणाले कीआपण महसूल मंत्रीपदाच्या माध्यमातून अत्यंत चांगले काम केले आहे. अनेकांना मदत केली आहे. त्याचबरोबर आपण निळवंडे कालव्यासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी आणला आहे.  निळवंडे कालव्याच्या कामासाठी हा विकासासाठी सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत कालव्यांची कामे जोमात सुरू होती आणि आपल्याला या कालव्यांद्वारे निळवंडेचे पाणी ऑक्टो बर 2022 मध्येच शेतकऱ्यांच्या शेतात देण्याचा आपला विचार होता मात्र सरकार बदलले आणि निळवंडे कालव्यांची गतीने सुरू असलेली कामे अचानक थांबली असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

भारत जोडो अभियान राज्यात आपण यशस्वी केले. राज्य पातळीवर मोठी जबाबदारी आहे. अडचणीचा काळ लवकरच संपणार असून आपल्या तालुक्याची यशस्वी वाटचाल सर्वांच्या साथीने पुढे नेऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आ डॉ. तांबे म्हणाले की, निवडणुका ह्या लोकशाही मधील अविभाज्य घटक आहे संगमनेर तालुक्यात अनेक विकासात्मक कामे पूर्ण केली असून निळवंडेसह प्रकल्प ही आ. बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केला.  कालव्यांची कामेही प्रगतीपथावर आहे आहेत मात्र बाह्य शक्ती चुकीच्या मार्गाचा अवलंब करून तालुक्याच्या विकासात खोडा निर्माण करू पाहत आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासाची वाटचाल कायम ठेवण्यासाठी सर्वांनी आपसातील मतभेद विसरून आ थोरात यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button