नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याणसह अन्य विभागासंदर्भात 13 तारांकीत आणि अन्य पाच अतारांकीत प्रश्न जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले आहे. त्याचे उत्तरे संबंधित विभागांकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणार्या हिवाळी अधिवेशनात नगरच्या काही तारांकीत प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, तारांकीत प्रश्नांमध्ये माध्यमिक शिक्षण विभागाच्या त्या 35 मान्यतेचाही समावेश असल्याचे सूत्रांकडून समजले. महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि.19 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. दि.30 डिसेंबर रोजी ते संपणार आहे. या अधिवेशन कालावधीमध्ये विविध शासकीय कामकाज, अशासकीय कामकाज, पुरवणी मागणी, पुरवण्या मागण्या सादर करणे, पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करुन निर्णय घेतले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा परिषदेला काही प्रश्न तारांकीत म्हणून प्राप्त आहेत. जिल्हा परिषदेला 13 तारांकीत प्रश्न असून, यातील शिक्षणचे 11, तर ग्रामपंचायत आणि महिला व बालकल्याण विभागातूनही एक-एक प्रश्न आल्याचे समजले. यात शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया, शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही, विस्तार अधिकारी पदासाठी पदोन्नती, केंद्र प्रमुखांच्या 100 टक्के जागा भरणे, विज्ञान शिक्षक संख्या वाढविणे या अनुषंगाने आणखी राज्यस्तरीय प्रश्नांचा समावेश आहे.
तर ग्रामपंचायत विभागाकडे आलेला प्रश्न हा शासकीय जमिनींसंदर्भात असल्याचे समजते. महिला व बालकल्याणमधील बालविकास प्रकल्प अधिकार रिक्त जागांबाबतही एक प्रश्न होता. या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासकीय स्तरावरून पाठविण्यात आलेली आहे. आता यावर सोमवारपासून सुरू होणार्या अधिवेशनात चर्चा होऊन त्यात रिक्त पदे असतील किंवा अन्य वादग्रस्त शिक्षक, तुकडी इ. मान्यता यावरही काही ठोस निर्णय होऊ शकतो. त्यामुळे या अधिवेशनाकडे नगरकरांचे लक्ष असणार आहे.
झेडपी अर्थसंदर्भात मंत्री महाजनांकडे तक्रार करणार
जिल्हा परिषदेतून साई संस्थानच्या निधीवरील व्याजाचा दुरुपयोग झाला आहे. तत्कालिन सदस्यांनाच प्रशासनाने अंधारात ठेवले. शाळा खोल्या न बांधता चुकीच्या पद्धतीने सेसमध्ये संस्थानच्या रकमेवरील व्याज वापरले आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी सीईओंना संपर्क केला होता. मात्र तो होऊ शकला नाही. आता नागपूर अधिवेशनादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून या प्रकाराकडज्ञे लक्ष वेधणार असल्याचे भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी सांगितले.