दत्ता पाचपुते :
काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांच्या मुलाविरोधात सख्ख्या पुतण्याने बंड करत आवाहन दिले. पाचपुते यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकविणार्या पुतण्यामागे माजी आ. राहुल जगताप-राजेंद्र नागवडे यांनी ताकद उभी करत आ. पाचपुते यांची कोंडी केली. सरपंच पदासाठी सख्खे चुलतभावांचे समोरासमोर दोन पॅनल झाल्याने काष्टीची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुतणे साजन पाचपुते यांच्या बंडामुळे आमदार पाचपुतेंच्या समोर मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी (दि.7) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी माघारीची मुदत होती. सहा वार्डातील 18 जागेसाठी एकूण 40 उमेदवार रिंगणार उभे राहिले असून, त्यात सरपंचपदासाठी तीन उमेदवार आहेत. आमदार बबनराव पाचपुते याचा धाकटा मुलगा प्रतापसिंह विरुद्ध पुतण्या साजन पाचपुते यांच्यात सरपंच पदासाठी सरळ लढत होणार आहे. ओबीसी डॉ. अनिल कोकाटे यांनी सरपंच पदासाठी अपक्ष उमेदवारी ठेवली आहे.आमदार बबनराव पाचपुते गटाविरोधात ज्येष्ठ नेते कैलासराव पाचपुते, काष्टी संस्थेचे अध्यक्ष राकेश कैलासराव पाचपुते यांनी साजन पाचपुते यांच्यासोबत आघाडी केली.
कैलास पाचपुते गटाला 11 तर साजन सदाशिव पाचपुते यांना सहा जागा देण्यात आल्या. सरपंचपदासाठी प्रतापसिंह पाचपुते विरूद्ध साजन पाचपुते यांच्यामध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे. आमदार पाचपुते यांची चाळी वर्षांपासून गावात एकहाती सत्ता आहे. परंतु, गत पंचवार्षिक सदस्यांच्या कारभाराला कंटाळून अनेकांनी पार्टी बदल केला आहे. सत्ताधारी गटाला धुळ चारून परिवर्तन घडविण्याठी विरोधकांनी ताकद पणाला लावली आहे. स्व.सदाअण्णा यांच्या कार्यकर्त्यांना आमदार पाचपुते यांच्याकडून योग्य न्याय मिळत नसल्याने वडिलांच्या कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी आमदार पाचपुते यांच्या विरूद्ध पुतण्या साजन यांनी दंड थोपटून मोठे आव्हान उभे केले आहे.
आमदार पाचपुते यांच्याकडून स्व.सदाअण्णाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नव्हता. तसेच, गावात विकासाची अनेक कामे प्रलंबित आहेत, ती पूर्ण करून वडील स्व. अण्णांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरपंचपदासाठी उमेदवारी केली, असे साजन सदाशिव पाचपुते यांनी सांगितले.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उमेदवारी करून आ. बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून निधी आणून राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी नव्या चेहर्यांना संधी देवू. तरुणांनाबरोबर घेऊन उमेदवारी केली आहे, असे प्रतापसिंह बबनराव पाचपुते यांनी सांगितले.