मावळ: आंबी पुलाचे काम पूर्ण न झाल्यास नितीन मराठे घेणार जलसमाधी | पुढारी

मावळ: आंबी पुलाचे काम पूर्ण न झाल्यास नितीन मराठे घेणार जलसमाधी

मावळ: तालुक्यातील तळेगाव स्टेशन ते आंबी रोडवरील आंबी येथील पुलाचे काम पूर्ण न झाल्यास सोमवार १२ डिसेंबर रोजी जलसमाधी घेणार, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी दिला आहे. या बाबतचे निवदेन त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना सोमवारी दिले आहे.

वराळे-आंबी आणि तळेगाव एमआयडीसीच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा जुना पुल हा अवजड वाहनांमुळे ढासळला. त्यानंतर नवीन पुलाचे काम सुरु करण्यात आले. नवीन पुलाचे काम गेली तीन वर्षापासून सुरु आहे. जवळजवळ ८० टक्के काम पहिल्या टप्यातील पुर्ण झाले. उरलेले २० टक्के काम गेल्या २वर्षांपासून थांबलेले आहे. आठ ते नऊ गावांचा मुख्य रस्ता असणारा हा पुल बंद असल्यामुळे नागरीकांना, एमआयडीसी कामगार आणि शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तसेच सर्वसामान्य नागरिकांबरोबर एमआयडीसीतील सर्व कंपन्यांना ९ ते १० किलोमिटर अंतराचा वळसा घालुन वाहतुक करावी लागत आहे. संबधित पुलाचे काम सुरु करण्यासाठी संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. योग्य ती कार्यवाही करुन पुलाचे काम सुरु करावे आणि लवकरात लवकर पुल नागरीकांसाठी खुला करावा, असे या निवेदनात नमूद केले आहे.

Back to top button