नगर : ऊसतोडणीसाठी पैसे द्या; मजुरांचा तगादा
नगर : पुढारी वृत्तसेवा : ऊसतोडणीसाठी पैसे द्या, असा तगादा तोडणी मजूर व मुकादम यांच्याकडून सुरु आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. या वाढत्या प्रकारला आळा घालण्यासाठी साखर कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केले आहेत. याबाबत तत्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन साखर सहसंचालक यांनी शेतकर्यांना केले आहे. केली आहे. ऊस तोडणीसाठी शेतकर्यांना पैसे मागू नका असे आदेश आहेत.
परंतु ऊसतोडणी मजूर व मुकादम पैसे मागत शेतकर्यांची पिळवणूक करीत आहेत. याबाबत कारखान्यांकडे शेतकरी तक्रार करीत आहे. या तक्रारींची दखल साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी दखल घेतली. या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक कारखान्याने तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केले आहेत. उपलब्ध तक्रारींमध्ये तथ्थ आढळून आल्यास संबंधित मुकादमांच्या बिलातून रक्कम वजा करुन संबंधित शेतकर्यांना अदा केली जाणार असल्याचे सहसंचालक भालेराव यांनी सांगितले. जिल्ह्यात कर्मवीर काळे, सहकार महर्षी कोल्हे, विखे पाटील, भाऊसाहेब थोरात, कुकडी, ज्ञानेश्वर, अशोक, गणेश, मुळा, अगस्ती, गंगामाई यासह 23 कारखाने सुरू आहेत.