नगर: ग्रामसुरक्षा दलामुळे गुन्हेगारांवर वचक; कोळगाव येथे ग्रामस्थांसमोर प्रात्यक्षिक | पुढारी

नगर: ग्रामसुरक्षा दलामुळे गुन्हेगारांवर वचक; कोळगाव येथे ग्रामस्थांसमोर प्रात्यक्षिक

कोळगाव, पुढारी वृत्तसेवा: ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे गुन्हेगारीवर वचक बसण्यास मदत होते. तसेच, आपत्तीच्या घटनांमध्ये तत्काळ मदत मिळू शकते, असे प्रतिपादन ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी केले.

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात विविध उदाहरणे देत ग्रामसुरक्षा यंत्रणेची गरज व महत्त्व याची माहिती त्यांनी दिली. ग्रामसुरक्षा यंत्रणा गावोगावी कार्यान्वित झाल्यानंतर चोरी, दरोडा, आग, जळीताच्या घटना, लहान मुले हरवणे, शेतातील पिकांची चोरी, वन्यप्राणी हल्ला, गंभीर अपघात, पूर, भूकंप यासारख्या आपत्तीच्या घटनांमध्ये एकाचवेळी सर्व गावाला सूचना देणे, सावध करणे अथवा एकाचवेळी सर्वांना मदतीसाठी बोलाविता येणे शक्य होते. त्याचे प्रात्यक्षिक यावेळी उपस्थित नागरिकांना देण्यात आले.

सध्या ग्रामीण भागात चोर्‍या, तसेच विविध अवैध व्यवसायांचे वाढते प्रमाण आहे. रोख रक्कम, सोने, चांदी यासह डाळिंब, कापूस, कांदा या सारख्या पिकांचा चोरीत समावेश आहे. काही भागात चोरी, दरोडा, अपघात यासारख्या घडत असलेल्या घटनांवर मात करत मदत मिळविण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून एका फोन कॉलवर नुकसान टाळता येते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, क्राईम ब्रँचचे हसन शेख, श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, सर्वज्ञ मल्टिस्टेटचे चेअरमन राजेंद्र नलगे, कुकडी कारखान्याचे संचालक मच्छिंद्र लगड व सुभाष लगड, विश्वास थोरात, सरपंच अमोल काळे, उपसरपंच नितीन मोहारे, सदस्य विजय नलगे, अमित लगड, पंकज उजागरे, नागेश काळे, सोसायटीचे चेअरमन नंदकुमार लगड, व्हाईस चेअरमन जालिंदर साबळे, संचालक पद्माकर गाडेकर, गोरख घोंडगे, पोलिस पाटील शामराव धस आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामसुरक्षा यंत्रणेचा टोल फ्री क्रमांक

नागरिकांनी चोरी, दरोडा, अपघात यासारख्या व इतर संकटकाळात ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या 18002703600 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. फोन करणार्‍या व्यक्तीचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला तत्काळ मदत मिळून पुढील नुकसान टाळता येते. नागरिकांनी ग्रामीण सुरक्षा यंत्रणेत सहभागी होऊन आपले नंबर नोंदवावे व या यंत्रणेचा वापर करावा, असे आवाहन गोर्डे यांनी केले.

Back to top button