जनतेच्या उद्रेकास राष्ट्रवादीच जबाबदार : ना. विखे | पुढारी

जनतेच्या उद्रेकास राष्ट्रवादीच जबाबदार : ना. विखे

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  तीव्र लोकभावना असलेल्या गावांमध्ये वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे, त्यामुळे समस्यांमुळे ग्रामस्थांच्या उद्रेकास सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केला.
दरम्यान, समस्याग्रस्त गावांना विशेष पॅकेज देवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही ना. विखे पा. यांनी दिली. संविधान दिन कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना ना.विखे पा. यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. या राज्यात 15 वर्षे युपीएचे सरकार होते. पश्चिम महाराष्ट्रातील स्थलांतरीत होण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या या गावांवर वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे. मग 15 वर्षे सत्तेत राहुन तुम्ही काय मिळविले, हे पाप तुम्ही कोणाच्या माथी मारणार, असा सवाल करुन, मागील अडीच वर्षेही सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच या गावांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली.

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची खिल्ली उडविताना ना. विखे पा. म्हणाले की, स्क्रीप्ट लिहिने अन् दिलेल्या स्क्रीप्ट वाचने याचा मोठा अनुभव त्यांना आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना संजय राऊत यांना दररोज दिली जाणारी स्क्रीप्ट ही ‘सिल्व्हर ओक’ येथूनच येत होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपात कुठेलेही तथ्य नसल्याचे ना. विखे पा. यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अपुर्‍या सुविधा असलेल्या गावांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पॅकेज जाहीर करुन, या ग्रामस्थांना दिलासा देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. तीव्र भावना असलेल्या या गावातील प्रश्न सोडविण्यास राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. राष्ट्रवादीने विदर्भात शेतकरी दिंडी काढण्याचा घेतलेला निर्णय, उध्दव ठाकरे यांचा संवाद कार्यक्रम म्हणजे केवळ राजकीय फार्स आहे.

अडीच वर्षे सत्तेत असताना त्यांना शेतकरी व जनतेची आठवण झाली नाही. ते आता शेतकर्‍यांचा कळवळा घेवून घराबाहेर पडले, परंतु यापुर्वी मराठवाड्यात जावून शेतकर्‍यांसाठी 50 हजार कोटीच्या पॅकेजच्या घोषणेची आठवण मुख्यमंत्री पदावर असताना ठाकरे यांना झाली नाही. राष्ट्रवादीची शेतकरी दिंडी किंवा उध्दव ठाकरेंच्या संवाद कार्यक्रमाला कोणताही जनाधार मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आमदारांसह कामाख्या देवीला गेले असतील तर त्यात कोणतेही वावगे नाही, तो श्रध्देचा भाग आहे, या दौर्‍याला शुभेच्छा!

Back to top button