करंजी : भाजी विक्रेत्यांना महामार्गावरून हटविले | पुढारी

करंजी : भाजी विक्रेत्यांना महामार्गावरून हटविले

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगावच्या काही दिवसांपासून गुरुवारी भरणारा आठवडे बाजार अनेक भाजी विक्रेते ग्रामपंचायतने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर न बसता थेट रस्त्यावर बसत असल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी व्हायची. या संदर्भात दैनिक ‘पुढारी’ने ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले. यानंतर पुढील गुरुवारी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी रविकुमार देशमुख यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी सकाळी नऊ वाजल्यापासून बाजारतळ परिसरात येणार्‍या प्रत्येक भाजीविक्रेत्याला उपलब्ध जागेत बसण्याचे आवाहन करत होते. महामार्गालगत बसलेल्या भाजीविक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तशी सूचनाच ग्रामपंचायतीने दिली होती.

दुपारी दोन वाजेपर्यंत तिसगावमध्ये येणारा प्रत्येक भाजीविक्रेता रस्त्यावर अथवा रस्त्याच्या कडेला बसणार नाही. याची पूर्णपणे खबरदारी घेण्याचे काम ग्रामपंचायत कर्मचार्‍यांकडून केले जात होते. त्यामुळे गुरुवारी आठवडे बाजारच्या दिवशी एकही भाजी विक्रेता रस्त्यावर बसला नाही, तसेच इतर दुकानदारांसमोरही बसण्याची वेळ न आल्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी खुला राहिला. त्याचबरोबर तिसगावमधील इतर दुकानदारांचीही अडचण यामुळे दूर झाली.

पोलिसांना पत्र देऊनही दुर्लक्ष

आठवडे बाजारच्या दिवशी अनेक भाजीविक्रेते विनंती करूनही रस्त्यावर बसत होते. त्यामुळे आठवडे बाजारादिवशी या ठिकाणी वाहतूक कोंडी व्हायची, इतर दुकानदारांनाही या भाजीविक्रेत्यांमुळे अडथळा यायचा. दोन दिवसांपूर्वी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व पोलिस प्रशासनाशी चर्चा करून भाजीविक्रेत्यांना ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या जागेत बसण्याचे नियोजन करण्याचे सांगितले. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी कडक भूमिका घेतल्यामुळे एकही भाजीविक्रेता रस्त्यावर बसला नाही. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही; मात्र पोलिसांना पत्र देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे युवानेते भाऊसाहेब लवांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दंडात्मक कारवाई सुरू राहील

आठवडे बाजारच्या दिवशी अनेक भाजीविक्रेते रस्त्यावर बसत असल्याचे दिसून आले. गावातील राजकीय नेते मंडळीने यासंदर्भात सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने गुरुवारी सकाळपासून आम्ही बाजारतळ परिसरात येणार्‍या प्रत्येक भाजीविक्रेत्याला रस्त्यावर न बसण्याचे आवाहन केले. या आवाहनाला भाजीविक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बाजारादिवशी रस्त्यावर बसण्याचा प्रयत्न केल्यास दंडात्मक कारवाई निश्चितपणे केली जाणार आहे, असे ग्रामसेवक रविकुमार देशमुख यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

Back to top button