

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : केंद्र आणि राज्यासह साखर कारखान्यांचे ऊसासंदर्भात विविध मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली 17 व 18 नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचे राज्यभर ऊस तोड व ऊस वाहतूक बंद आंदोलन पुकारले आहे. या दोन दिवसांत शेतकर्यांनी ऊस तोड करू नये, रस्त्यावरून ऊस वाहतूक करू नये. आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेने केले होते. परंतू तरीदेखील ऊस वाहतूक होत असल्याचे भूमिपुत्रच्या निदर्शनास आल्याने संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील लिंब फाट्यावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, प्रदेश सचिव किरण वाबळे, तालुका कार्याध्यक्ष संजय भोर, माजी चेअरमन संजय भोर, नंदन भोर, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग दरेकर, मंजाबापू वाडेकर, शुभम टेकुडे, संतोष काकडे, बाबासाहेब वाडेकर, सुरेश गोळे, संतोष गागरे, ठमाजी भोर, राजू रोकडे, सुनील गागरे, माऊली गागरे, काशिनाथ गोळे यांच्यासह शेतकर्यांनी उसाचे ट्रॅक्टर कारखान्याकडे जात असताना रोखून धरले आहे. त्यामुळे आंदोलनाला वेगळेच वळण लागले आहे.
याबाबतची माहिती अशी की, चालू गळीत हंगामात एक रकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या उसाची एफ.आर.पी. अधिक 200 रुपये तातडीने जमा करावेत, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा, केंद्र सरकारने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल 3500 रुपये करावा, इथेनॉलच्या दरात 5 रुपयांची वाढ करावी, अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेची आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, दि. 17 व 18 नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
मागण्या मान्य न केल्याने भूमिपूत्र शेतकरी संघटनेने या आंदोलनाला सकाळपासूच सुरुवात केली आहे. दोन दिवस उसाचे एकही टिपरू कारखान्याला जाऊ देणार नाही, असा एल्गार पुकारत ऊस वाहतूक रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.