कोपरगाव शहरवासियांना पाच दिवसाआड पाणी पुरवठा
कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : एकेकाळी पाण्यामुळे वैभव प्राप्त कॅलिफोर्निया संबोधला जाणारा कोपरगाव तालुका पुन्हा एकदा पाणी असूनही पाण्यापासून वंचित झालेला आहे. दक्षिण गंगा गोदावरी नदी डोळ्यादेखत वाहती आहे.आजूबाजूला इतकी धरण असतानाही आजही शहरासाठी पाच दिवसाआड पाणी येते, हा दुर्दैवी प्रकार आहे. ‘धरण उशाला कोरड घशाला’ असाच काहीसा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. पाणी कसं येतय, तोही वेगळा प्रश्न आहे. काही प्रभागात गटार मिश्रीत शेवाळयुक्त काळे पाणी येते. त्यामुळे अनेक साथीचे आजार येतात. अनेक जण आजारी पडत आहेत.
गेल्या अनेक वषार्ंपासून वर्षातून पाणी फक्त 65 दिवस साधारण नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रभागांना येते तेही अस्वच्छ. 365 दिवसांपैकी केवळ 65 दिवस पाणी साधारणता मिळते. पट्टी मात्र वर्षभराची अकारली जाते. ती भरण्यास उशीर झाला तर दंड, नळ कनेक्शन तोडतात. पाण्याची ही परिस्थिती कधी सुधारेल? याचा प्रश्न नागरिकांसमोर आहे. जिव्हाळ्याचे पाणी प्रश्न स्वर्गीय ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने आवाज उठवत गोदावरीच्या तुटीच्या खोर्यात पाणी वाढले पाहिजे, पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवले पाहिजे, यासाठी विधिमंडळात मंजुरी घेतली.
तालुक्याबद्दल बोलत असताना आपण नाशिक विरुद्ध नगर, नगर विरुद्ध मराठवाडा असा वाद सातत्याने ऐकायला मिळतो. आपण हे विसरतो की, शेतकरी ही एकच जात आहे. तिला जात धर्म पंथ असे काही नसतं. त्याची एकच समस्या असते आणि एकच मागणी असते ती मुबलक पाण्याची. तेव्हा नगर- नाशिक- मराठवाडा हा काही पाण्याचा मुद्दा होऊ शकत नाही. राज्य सरकारची व राज्यकर्त्यांची जर कधी प्रामाणिक इच्छा असेल तर जसा कृष्णा खोरेमधला प्रश्न सोडविला गेला. तसा चाळीस पन्नास वर्षापासून गोदावरी खोर्यातील पाणी प्रश्न का सुटला नाही? नुसतं सातत्याने ती लोक म्हणतात मराठवाडा, नगर, नाशिकचा सुद्धा बराच भाग तहानलेला आहे.
मात्र सर्वांची प्रामाणिक इच्छा असेल आणि राजकीय जोडे बाजूला ठेवून खर्या अर्थाने जर कधी शेतकर्यांच्या हितासाठी निर्णय घ्यायचे असतील तर गोदावरी खोर्याचा प्रश्न मोठा आहे. कारण महाराष्ट्रातील जवळजवळ 35 ते 40 टक्के लोकसंख्या या गोदावरी बेसिंग मध्ये राहते. त्यांना पाण्यापासून वंचित ठेवले तर कधी ना कधी याचा विस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही.
पाण्याचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे त्यासाठी अहोरात्र गेली पन्नास-साठ वर्षे सातत्याने आपण लढा देत आहे. संपूर्ण आयुष्य विविध नेत्यांनी पाण्याच्या लढ्यासाठी दिले. परंतु अद्यापि हा प्रश्न सुटलेला नाही.
पश्चिमेचे पाणी जेथे समुद्राला जाते. त्याचा काहीही उपयोग होत नाही ते पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे कसे वळवता येईल, हे बघणे गरजेचे आहे. गोदावरी खोर्यात 100 ते 110 टीएमसी पाणी पाण्याची जी तूट आहे. ही आपल्याला कशी भरून काढता येईल, यासाठी एकत्र येऊन शेतकर्यांची आर्थिक स्थिती सुधारली तरच बाकीच्या सर्वांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. मात्र हे सर्व करण्यासाठी एकीच्या बळाची आवश्यकता आहे. असे जाणकारांचे मत आहे.
पाणी प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता
नगर- नाशिक- मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटल्याशिवाय शेतकरी खर्या अर्थाने सुखी होणार नाही. त्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खांद्याला खांदा देऊन पाणी प्रश्न सुटण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलनही करू, असे प्रतिपादन नुकतेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा आता पाणी प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.