नगर : जिल्हा परिषदेला दोन्ही नवे कार्यकारी अभियंता | पुढारी

नगर : जिल्हा परिषदेला दोन्ही नवे कार्यकारी अभियंता

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेत अनेक विभागात ‘प्रभारी’ राज असताना आता रिक्त जागांवर नियुक्त्या दिल्या जात आहे. बांधकाम दक्षिण विभागात कार्यकारी अभियंता म्हणून वंदेश वराडे यांची नियुक्ती झाली आहे, तर डिसेंबरपासून बदली झाल्याची चर्चा असलेले रवींद्र परदेशी यांच्या जागी एस.व्ही सोनवणे हे बदलीवर आल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. या बदलामुळे आता बांधकाम विभागात आणखी पारदर्शकता येईल, अशी जनतेलाही अपेक्षा आहे.  जिल्हा परिषदेचा कारभार गतीमान करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे आपल्या विविध संकल्पना राबवत आहेत. अतिरीक्त सीईओ संभाजी लांगोरे हे देखील स्वतः बांधकामचा वेळोवेळी आढावा घेत असतात.

मात्र, दक्षिण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पद रिक्त असल्याने त्याठिकाणी पूर्वी ग्रामीण पाणी पुरवठ्याचे जोशी, त्यानंतर पारनेरहून बोावलेल्या कानिटकर यांच्याकडे प्रभारी पदभार दिला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कानिटकर यांच्याजागी कायमस्वरुपी कार्यकारी अभियंता म्हणून वंदेश वराडे यांची नगरला बदली झाली आहे. वराडे हे पदोन्नतीवर नगरला आले आहेत.
उत्तरेतही रवींद्र परदेशी हे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. मात्र, डिसेंबरमध्येच त्यांच्या बदलीचे आदेश झाले होते. परंतु, त्यानंतर या बदलीला स्थगिती मिळाल्याने ते नगरलाच तळ ठोकून होते. आता राज्यात सरकार बदलल्यानंतर पुन्हा ह्या बदल्या सुरू झाल्या आणि त्यात परदेशी यांच्या जागी मालेगावहून एस.व्ही सोनवणे हे हजर होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, जर पुन्हा बदली आदेश स्थगित झाला, तर परदेशी यांनाच या ठिकाणी संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे.

गटशिक्षणाधिकार्‍यांची पदे कधी भरणार?
जिल्ह्यातील 7 पेक्षा अधिक तालुक्यांत गटशिक्षणाधिकारी हे पद रिक्त आहेत. या ठिकाणी विस्तार अधिकार्‍यांवर प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी चांगले काम आहे, तर काही ठिकाणचा आरडाओरडा सुरूच आहे. अशावेळी शासनाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र गटशिक्षणाधिकारी नियुक्त करावा, असा सूर पालकवर्गातून बाहेर येताना दिसत आहे. सीईओंनी याप्रकरणी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

‘उत्तर’ला आणखी गती येणार!
बांधकाम विभागात ‘उत्तर’ नेहमीच चर्चेत होते. या ठिकाणच्या कारभारावर अनेकदा वेगवेगळ्या चर्चा झाल्या, मात्र प्रशासनाकडून कधीही कठोर भूमिका घेतली जात नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. आता या बदलीनंतर कारभारात आणखी पारदर्शकता येऊन कामकाजाला गती येईल, अशी नगरकरांना अपेक्षा आहे.

Back to top button