अकोले: कारखाना चालवणे हे वेड्या गबाळ्याचे काम नाही; अगस्ती कारखाना गळीत हंगाम शुभारंभ
अकोले: अगस्ती साखर कारखाना अडचणीत असला तरी उपपदार्थ निर्मिती करून आपण कारखाना सुस्थितीत आणू शकतो, त्या बरोबरच कारखाना हा काटकसरीने चालवला पाहिजे. कारखान्याचा एकही कर्मचारी बाहेर कामासाठी वापरू नका. कारखाना चालवणे हे वेड्या गबाळ्याचं काम नाही असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले.
अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या २९ वा ऊस गळीत हंगाम व आसवणी प्रकल्प शुभारंभ राज्याचे विरोधी पक्षनेते ना.अजित पवार यांचे हस्ते व आ. डॉ. किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले पाटील, बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संचालक प्रशांत गायकवाड, उत्तर नगर शिवसेना प्रमुख रावसाहेब पाटील खेवरे,अगस्तीचे अध्यक्ष सिताराम पा. गायकर, व्हा. चेअरमन अशोकराव भांगरे, कपिल पवार, संदिप वर्पे, माजी चेअरमन प्रकाशराव मालुंजकर, कॉ. कारभारी पा.उगले, मधुकरराव नवले, डॉ.अजित नवले, विजय वाकचौरे, अमित भांगरे, मारुती मेंगाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की, मला वयाच्या २४ वर्षापासून कारखान्याच्या संचालक पदाचा अनुभव आहे. मी सहकारी संस्थाचा पाठीराखा, समर्थक आहे. २००९ च्या दरम्यान विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सरकारने सहकारी साखर कारखान्यांना भाग भांडवल न देण्याचा निर्णय घेतल्याने तेव्हापासून नवीन सहकारी साखर कारखाने उभे राहू शकले नाहीत. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला सहकारी साखर कारखाना उभारला तेव्हा पासून सहकार हळूहळू वाढु लागला.
आता कारखान्यात स्पर्धा वाढली आहे. सिरप ते इथेनॅाल उत्पादन सुरु झाले. अगस्तीने ३० हजार डिस्टलरी मध्ये आर/एस व बी हेव्हि उत्पादन घेतले पाहिजे. जेवढे ऊसातुन साखर जास्त निघेल तेवढी रिकव्हरी जास्त आणि एफआरपीही जास्त मिळते. यावेळी अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सिताराम गायकर म्हणाले की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा सहकारी बॅकेच्या सहकार्याने अगस्ती कारखाना बंद पडू देणार नाही तर सक्षमपणे चालवुन दाखवणार आहे.
यावेळी बोलताना आ.डॉ. किरण लहामटे म्हणाले की, अकोले शहराला मोठा निधी आणला होता. पण नगरपंचायतीने एनओसी दिली नाही म्हणून निधी पुन्हा गेला. परंतु नेतृत्वाने दिल पण मात्र इथल्या राज्यकर्त्यांनी वैभव पिचड म्हणाले लहामटेची कामे झाली पाहिजे असा काही नवस नाही. त्यामुळे शहर व तालुक्याचा विकास खोळंबला आहे. परंतु विरोधी पक्षनेते अजितदादाच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय चिन्हावर करा
दरम्यान अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजपाच्या माघारीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपाचे अभिनंदन करीत कौतुक केले. जर खासदारकी, आमदारकी आणि स्थानिक स्वराज्य संस्था पक्षीय चिन्हावर निवडणूक होतात. मग ग्रामपंचायतला अडचण काय..? ग्रामपंचायत निवडणुकीही चिन्हावर व्हाव्या अशी मागणी अजितदादांनी पवार यांनी केली.