संगमनेर : जे पार्टी जोडू शकत नाहीत ते देश काय जोडणार : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल | पुढारी

संगमनेर : जे पार्टी जोडू शकत नाहीत ते देश काय जोडणार : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : ज्यांच्याकडे नेतृत्व क्षमता, समज नाही ते आज देशभरात काँग्रेसची यात्रा घेऊन निघाले आहेत. मात्र जे पार्टी जोडू शकत नाहीत ते देश काय जोडणार अशा शब्दात अन्नप्रकिया उद्योगआणि जलशक्ती विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी राहुल काँग्रेसची युवा नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. शिर्डी लोकसभा मतदार संघातील सर्वच विधानसभा मतदारसंघाचा दौरा केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल व राज्याचे महसूल आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

त्यानंतर संगमनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेवर टीका करताना, ना पटेल म्हणाले की या पक्षाकडे आता नेतृत्वच राहिलेले नाही. सत्तेपासून दूर गेल्यामुळे हा पक्ष बेचैन झाला आहे. ८०वे दशक असो की आत्ताचे असो ज्या-ज्या वेळेस काँग्रेस सत्तेपासून दूर गेले त्या त्यावेळेस काँग्रेसने राष्ट्रविरोधी शक्तीशी हातमिळवणी करण्यासही मागे पुढे पाहिले नाही. पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर कोणतीही प्रतिक्रीया या पक्षाकडून पुढे आल्याचे दिसत नाही. त्यामुळेच या पक्षाला देशापेक्षा स्वत:च्या अस्तित्वाची अधिक चिंता असल्याचा खोचक टोला केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी काँग्रेसला लगावला.

Back to top button