नगर : पुढारी वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तोफखाना आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत हुक्का पार्लरवर छापे टाकून 46 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शनिवारी (दि. 24) पहाटेपर्यंत झालेल्या या कारवाईत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. तोफखाना व एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. एलसीबीच्या पथकाने सावेडीतील हॉटेल पंचशील येथे पहिली कारवाई केली.
हुक्का पार्लरचालक भागेश्वर रॉय (वय 23, रा. हॉटेल पंचशील, सावेडी नाक्याजवळ) हा हुक्का पुरविताना आणि आयुष भीम भटराय (वय 21, रा. दातरंगे मळा), साकिब आरीफ शेख (वय 19, रा. मुकुंदनगर), आझम आझीम शेख (वय 19, रा. मुकुंदनगर) हे हुक्का ओढताना आढळले. त्यांच्याकडून 16 हजार 300 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. दुसरी कारवाई हॉटेल विराम (कुष्ठधाम रस्ता, सावेडी) येथे झाली. तेथे पार्लर चालक जसविन राकेश पहुजा (वय 24, रा. गुलमोहर रोड, रिध्दी सिध्दी कॉलनी, सावेडी), तसेच ऋषिकेश सतीश हिंगे (वय 21, रा. भुतकरवाडी), अक्षय नाना शिंदे (वय 22, रा. सारसनगर), आकाश डॅनिअल पाटोळे (वय 22, रा. सोलापूर रोड), ऋषी मनीष छजलानी (वय 20, रा. पोलिस लाईनजवळ, भिंगार), हर्षल रणजीत बैराट (वय 21, रा. नेहरू कॉलनी, भिंगार), नितीन राजू मोरे (वय 33, रा. वाणीनगर, पाईपलाईन रोड), सागर पन्ना काळे (वय 32, रा. धानोरे ता.आष्टी, जि. बीड), किरण कुमार काळे (वय 24, रा.नालेगाव, नगर), भैरवनाथ बबन धीवर (वय 39, रा.सावेडी तलाठी ऑफिसजवळ) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 19 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
तिसरी कारवाई विळद घाट परिसरातील हॉटेल द किंग कॅफेवर करण्यात आली. हुक्का पार्लर चालक शिवाजी संतराम गांगर्डे (वय 56, रा. दत्तनगर, शेंडी बायपास चौक, एमआयडीसी, वडगाव गुप्ता) व दिनेश ज्ञानेश्वर मिसाळ (वय 25, रा. रेणुकानगर,बोल्हेगाव फाटा) या दोघांना ताब्यात घेऊन 18 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व 16 आरोपींविरुद्ध् गुन्हा दाखल करण्यातआला आहे.
जुगार अड्ड्यांवर छापे का नाही?
एलसीबीने हुक्का पार्लवर केलेल्या कारवाईनंतर संबंधित पोलिस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हुक्का पार्लर्सप्रमाणेच शहरातील जुगार अड्ड्यांचे डाव कोणाच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा प्रश्न नगरकरांकडून विचारण्यात येत आहे.