अवैध दारु निर्मिती, विक्री बंद करा : उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई | पुढारी

अवैध दारु निर्मिती, विक्री बंद करा : उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ज्या गावांत अवैध दारु निर्मिती व विक्री होते. त्या ठिकाणी कडक कारवाई करून ते बंद करा. ज्या ठिकाणाहून अवैध दारुची वाहतूक होते तेथे भरारी पथकाद्वारे तत्काळ कारवाई करण्यात यावी, अवैधरित्या मद्य निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा,असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.  नगर येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्य उत्पादन विभागाचा आढावा घेतला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अनिल चाचकर, नगरचे अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक नितेश शेंडे, विभागाचे जिल्ह्यातील सर्व कार्यकारी निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, भरारी पथकाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाला दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा शासनातर्फे उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या विविध कार्यप्रणालीमध्ये अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर करण्याबाबतही त्यांनी यावेळी सूचना दिल्यात. विभागाचे प्रस्तावित असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. नवीन वाहनांची आवश्यकता पाहून ती पुरविण्यांबाबत विभाग सकारात्मक असल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले.
जिल्ह्यात सन 2022-23 साठी जमा महसुलीचे एकुण 2263.85 कोटींचे उद्दिष्ट दिलेले असून, त्यापैकी आजअखेर 907 कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य झालेले आहे. महसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिले.

प्रारंभी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी जिल्ह्यात कार्यरत असणारे भरारी पथके, मद्यनिर्मिती, परवानाधारक दारु विक्री, मळी उत्पादन व साठवणूक, मद्य विक्री महसुलाचे उद्दिष्ट व जमा महसुल तसेच दारुबंदी कायद्याअंतर्गत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली.

पोलिस धर्तीवर खबर्‍यांचे जाळे तयार करा
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती, विक्री करणार्‍यांवर वचक बसावा, या दृष्टीने अधिकारी व कर्मचार्‍यांनी कामकाज करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत वचक कमी होता कामा नये. त्यासाठी जिल्ह्यात पोलिस विभागाच्या धर्तीवर खबर्‍यांचे जाळे तयार करा, असे निर्देश मंत्री देसाई यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले.

Back to top button