लोणी : 21,410 शेतकर्‍यांना 2 कोटी 91 लाख: ना. राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

लोणी : 21,410 शेतकर्‍यांना 2 कोटी 91 लाख: ना. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी; पुढारी वृत्तसेवा: जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान अ.नगर जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 172 गावांमधील 21,410 शेतकर्‍यांना 2 कोटी 91 लाख रुपयांच्या मदतीचा दिलासा राज्य सरकारने दिल्याची माहिती महसूल, पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अ.नगर जिल्ह्यात जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव, संगमनेर, अकोले, अ. नगर, राहुरी, कोपरगाव, राहाता या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.

यामुळे 172 गावांमधील सुमारे 1 हजार 319 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेती पिकांचे महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले होते. झालेल्या नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे जिल्हा प्रशासनाने पाठविला होता. त्यानुसार ही मदत जाहीर झाल्याचे ना. विखे म्हणाले. जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जामखेड तालुक्यातील 2 गावांमधील 62 शेतकर्‍यांना 1 लाख 46 हजार 315 रुपये, श्रीगोंदा तालुक्यात 45 शेतकर्‍यांना 3 लाख 22 हजार 830रु., शेवगाव तालुक्यात 23 शेतकर्‍यांना 1 लाख 43 हजार 100 रुपये तर संगमनेर तालुक्यात 314 शेतकर्‍यांना 29 लाख 69 हजार 730 रुपये मदत जाहीर झाली आहे.

जुलै महिन्यात अकोले तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत 112 गावांत शेतीक्षेत्राचे नुकसान झाले. यामध्ये 19 हजार 319 शेतकर्‍यांना 58 लाख 31 हजार 293 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात राहुरी, कोपरगाव आणि राहाता या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात आली. यामध्ये राहुरी तालुक्यातील 409 शेतकर्‍यांना 60 लाख 89 हजार 280 रुपये तर कोपरगाव तालुक्यातील 1171 शेतकर्‍यांना 1 कोटी 31 लाख रुपयांची मदत जाहीर झाली. राहाता तालुक्यातील 64 शेतकर्‍यांना 4 लाख 62 हजार रुपयांच्या मदतीचा दिलासा राज्य सरकारने दिला आहे.

शेतकर्‍यांच्या खात्यात निधी जमा करणार..!
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 हजार 500 कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. सप्टेंबर महिन्यात ही मदत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याची ग्वाही दिली होती. जाहीर झालेली मदत लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग होणार असल्याचे ना. विखे पा. यांनी सांगितले.

Back to top button