लांडग्याच्या हल्ल्यामध्ये दोन शेतकरी गंभीर जखमी, एकाला उपचारार्थ नगरला हलविले | पुढारी

लांडग्याच्या हल्ल्यामध्ये दोन शेतकरी गंभीर जखमी, एकाला उपचारार्थ नगरला हलविले

बोधेगाव, पुढारी वृत्तसेवा: शेवगाव तालुक्यातील सुकळी आणि शेकटे गावातील दोन शेतकरी सोमवारी सायंकाळी शेतीचे कामे उरकून घरी परतत असताना त्यांच्यावर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने उपचारार्थ बोधेगावातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नगरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे बोधेगाव परिसरात शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सायंकाळी घरी परतणारे शेतकरी भारत नानासाहेब भवर (रा.सुकळी) व शेकटे बुद्रूक येथील भागवत आस्मानराव गरड यांच्यावर अचानक पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला चढविला. यामध्ये त्यांच्या तोंडावर नख्यांनी, तर पाय व हातावर चावा घेतल्याने शेतकरी रक्तभंबाळ झाले. या हल्ल्यात दोन्ही शेतकरी जबर जखमी झाले. त्यांना बोधेगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. येथे प्राथमिक उपचारानंतर भागवत गरड यांच्या नाका, तोंडला खोलवर जखमा झाल्याने त्यांना नगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. ही घटना सोमवारी (दि.5) सायंकाळी साडे सहा ते सातच्या दरम्यान घडली.

नगर – बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवरील ही गावे आहेत. उपवन संरक्षक दयाराम गोंदके यांच्या मार्गदर्शना खाली वनपरिक्षेत्र अधिकारी अरूण सांबळे, वनपाल आर. एम. शिरसाठ, वनरक्षक नौशाद पठाण, वनरक्षक आप्पा घनवट, वन मजदूर मच्छिंद्र शेळके, भाऊसाहेब खंडागळे, सर्पमित्र सुशांत मनोरे आदींच्या टीम घटनास्थळी दाखल झाली असून, त्यांनी घटनेचा पंचनामा केला असून, हल्ला जखमी झालेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. घटनास्थळी पाहणी करून त्याच्या पायाचे ठसे घेतले असून, तो लांडगाच असल्याचे वनाधिकार्‍याकडून सांगण्यात आले. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना शासनाकडून तत्काळ अर्थसाह्य म्हणून सव्वा लाख रुपयापर्यंत मदत दिली जात असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी अरूण साबळे यांनी दिली. संबंधितांकडून योग्य ती कागदपत्रे घेऊन उप वनसंरक्षक दयाराम गोंदके यांच्या मार्गदर्शना खाली हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकर्‍यांना तातडीची मदत मिळावी म्हणून प्रस्ताव त्वरित सादर करणार असल्याचे सांगितले.

‘मदतही तत्काळ मिळवून देणार’

मदतही तत्काळ मिळवून देणार असल्याचे सांगितले. तसेच, जखमींच्या कुटुंबीयांनी कुठल्याही प्रकारची काळजी न करता उपचारासाठी खर्च करून जखमी व्यक्तींकडे लक्ष दयावे, असे आवाहन वन परीक्षेत्र अधिकारी अरूण साबळे यांनी केले.

‘शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी’

बालमटाकळी, मुरुमी, बाडगव्हाण, गायकवाड जळगाव, सुकळी, शेकटे बुद्रूक, बोधेगाव परिसरातील शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाच्या आधिकार्‍यांनी केले.

Back to top button