7 गावांना पाण्यासाठी साडेतेरा कोटी : ना. राधाकृष्ण विखे | पुढारी

7 गावांना पाण्यासाठी साडेतेरा कोटी : ना. राधाकृष्ण विखे

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या संगमनेर तालुक्यातील 7 गावांच्या पाणी पुरवठा योजनेकरिता 13 कोटी 49 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत या पाणी पुरवठा योजनांची कामे मार्गी लागणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिली. केंद्र सरकारने ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून दिली आहे.

हर घर जल, ही संकल्पना घेेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक घरामध्ये पाणी पुरवठा करण्याचा संकल्प केला आहे. शिर्डी मतदार संघातही जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कार्यवाही सुरु झाल्याचे सांगतानाच या सर्व पाणी पुरवठा योजनांकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचेही विशेष सहकार्य लाभल्याचे ना. विखे पा. यांनी सांगितले.

प्रतापपूर, रहिमपूर, आश्वी बु, आश्वी खुर्द, दाढ खुर्द, निबांळे आणि ओझर बुद्रूक या 7 गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यासर्व प्रस्तावांना मंजुरी मिळावी म्हणून, ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी पाठपुरावा केला होता. या सर्व प्रस्तावांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या गावांतील पाणी योजनांच्या कामांचा मार्ग मोकळा झाल्याचे ना. विखे यांनी स्पष्ट केले.

प्रतापूर येथील पाणी पुरवठा योजनेस 1 कोटी 99 लाख, रहिमपूर 2 कोटी, आश्वी बु. 2 कोटी, आश्वी खुर्द 2 कोटी, दाढ खुर्द 1 कोटी 99 लाख, निंबाळे 1 कोटी 52 लाख, ओझर बुद्रूक 1 कोटी 99 लाख अशा पद्धतीने या पाणी पुरवठा योजनेच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना लवकरच सुरुवात होेऊन या सर्व गावांमधील ग्रामस्थांना पाण्याबाबत मोठा दिलासा मिळेल, पाण्याची समस्याही कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी व्यक्त केला.

‘हर घर जल’ या संकल्पनेतून ‘हर घर नळ..!’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर जल’ या संकल्पनेतून ‘हर घर नळ’ ही योजना राबवून संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील 28 गावांची पाणीटंचाई लवकरात-लवकर दूर करणार आहे, असे ना. राधाकृष्ण विखे पा. म्हणाले.

Back to top button