नगर : वाटापूरच्या रेवणनाथ समाधी मंदिराचे काम अंतिम टप्प्यात
कुकाणा, पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील वाटापूर येथे चैतन्य रेवणनाथ समाधी मंदिराचे बांधकाम लोक वर्गणीतून अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच बांधकाम पूर्ण होऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.
वाटापूर ग्रामस्थांचे आराध्य दैवत चैतन्य रेवणनाथ देवस्थान आहे. नवनाथ ग्रंथामध्ये वाटापूर येथील या रेवणनाथ समाधीबाबतचा उल्लेख असल्यामुळे या समाधी मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणी धर्मनाथ बीज उत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो. बन्सी महाराज तांबे यांनी 1974 मध्ये या ठिकाणी छोटे मंदिर बांधले होते. यानंतर मंदिर भाविकांसाठी धार्मिक कार्यक्रमांसाठी अपुरे पडत असल्याने ग्रामस्थांच्या परिश्रमातून व सहकार्यातून एक कोटीच्या आसपास खर्च करून नवीन मंदिराची उभारणी केली. लवकरच मंदिराचा जीर्णोद्धार करणार असल्याचे ग्रामस्थ, नाथभक्त, पुजार्यांनी सांगितले.