नगर : बसअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान | पुढारी

नगर : बसअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : राज्य परिवहन महामंडळाच्या ताराकपूर आगारातील अधिकारी – कर्मचार्‍यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे नगर तालुक्याच्या दक्षिण भागातील एस.टी.बसेसच्या फेर्‍यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. 3-3 दिवस बसेसच्या फेर्‍या वेळेवर होत नसल्याने या परिसरातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

विद्यार्थ्यांना बसची वाट पाहत थांबावे लागत असून, मिळेल त्या खासगी वाहनातून शाळेला जावे लागत असल्याने शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या भागातील बसेसच्या फेर्‍या सुरळीत न केल्यास तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी दिला आहे.

तालुक्याच्या दक्षिण भागातील वाळुंज, पारगाव, शिराढोण, दहिगाव, साकत, वाटेफळ, मठापिंप्री, हातवळण, आंबीलवाडी, वडगाव, तांदळी, गुणवडी, राळेगण आदी गावांमधील विद्यार्थी रुईछत्तीशी येथे शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यासाठी त्यांना एस.टी.बस शिवाय दुसरा पर्याय नाही. या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या सुमारे 500 च्या पुढे आहे. एस.टी.बस न आल्यास या विद्यार्थ्यांना एक तर शाळा बुडवावी लागते किंवा जे खासगी वाहन भेटेल त्या वाहनाने जावे लागते. यात मुलींच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, असे हराळ म्हणाले.

कोरोनामुळे सुमारे दोन वर्षे शाळा बंद होत्या. तसेच एस.टी.बसही बंद होत्या. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर एस.टी.कर्मचार्‍यांच्या संपामुळे बसेस अनेक दिवस बंद होत्या. आता कुठे शाळा आणि बसेस दोन्ही सुरू झाल्या आहेत. बस फेर्‍यांचे नियोजन कोलमडले आहे. या भागात कधी 2-2 दिवस, तर कधी 3-3 दिवस बसेसच्या फेर्‍या वेळेवर होत नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. याबाबत या पूर्वी एकदा तारकपूर आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे गुरुवारी (दि.18) दुपारी आगार व्यवस्थापक आघाव यांना पुन्हा एकदा निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. येत्या 2-3 दिवसांत या भागातील बसेसच्या फेर्‍या सुरळीत केल्या नाहीत, तर विद्यार्थी व नागरिकांच्या समवेत तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा हराळ यांनी दिला आहे.

Back to top button