नगर : कोळगावात कृषी केंद्र चालकांचा लाक्षणिक संप
कोळगाव, पुढारी वृत्तसेवा : युरिया, डीएपी सारख्या रासायनिक खतांचा पुरवठा करणार्या कंपनीच्या लिंकिंग धोरणाच्या विरोधात कोळगावातील रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके विक्रेता असोसिएशनर्फे कृषी सेवा केंद्राने एक दिवसाचा लाक्षणिक बंद यशस्वी केला आहे.
राज्यात सध्या खरीप हंगामासाठी युरिया, डीएपी 10:26:26 सारखे रासायनिक खते कंपनीकडून घ्यायचे असतील, तर त्यासोबत अनावश्यक खते, औषधे कृषी केंद्र विक्रेत्यांना घेण्याची सक्ती करण्यात येत होती. ही अनावश्यक खते घेतले नाही, तर आवश्यक असलेली खत मिळत नसल्याने नाईलाजाने औषधे कंपन्यांकडून घ्यावी लागत होती. विक्रेत्यांनाही अनावश्यक खते औषधे शेतकर्यांना द्यावी लागत होती. परंतु, त्यातून शेतकर्यांची नाराजी वाढत चालली. काही ठिकाणी वाद विवाद झाले. या सर्व गोष्टीमुळे कृषीसेवा केंद्र धारक वैतागले होते. म्हणून या विरोधात तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्राने एक दिवसीय संपाचे हत्यार उपसले होते.
हा संप यशस्वी करण्यामध्ये असोसिएशनचे कोळगावचे अध्यक्ष सागर नलगे, उत्तम लगड, संकेत नलगे, जनार्दन लगड, वैभव लगड, दत्तात्रय गोंगे, महेंद्र लाटे, प्रकाश लगड, बाजीराव साके, ऋषी धस, दीपक बोरूडे, प्रशांत घोरपडे, भाऊसाहेब साबळे, दिनेश देशमुख या कृषी सेवा केंद्र चालकांनी आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शविला. त्याचबरोबर उपसरपंच नितीन मोहारे, माजी उपसरपंच नितीन नलगे, सोसायटी संचालक गोरख घोंडगे, नितीन लगड, ईश्वर निंबाळकर, स्वप्निल भोईटे, रामभाऊ नलगे, योगेश मोरे, भूषण मोहारे, सचिन डुबल, अमित नलगे, अक्षय लगड या शेतकर्यांनीही कृषी सेवा केंद्रांच्या चालकांना आपला पाठिंबा व्यक्त केला.
असोसिएशनचे कोळगावचे अध्यक्ष सागर नलगे व उपाध्यक्ष उत्तम लगड म्हणाले, रासायनिक खते कंपन्यांनी आवश्यक खतांबरोबर अनावश्यक खते आणि औषधांची सक्ती केली आहे. आमच्यावर शेतकर्यांचा रोष ओढवला आहे. तसेच, कृषी अधिकारी सातत्याने अनावश्यक खते आणि औषधांची शेतकर्यांना सक्ती करू नये अन्यथा कारवाईचे आदेश देत असल्याने यामध्ये कृषी सेवा केंद्र चालकांचे अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली. सरकारने लक्ष घालून विक्रेते व डीलरमध्ये समन्वय साधून शेतकर्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र संप करण्यात येईल.