काष्टी: श्रीगोंदा तालुक्यातील नगर येथील कौठा – आर्वी-अनगरे व अजनुज शिव आहे. हा रस्ता उत्तर दक्षिण आहे. अनगरे – कौठा शिव रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. दक्षिणेस भीमा नदीचे पात्र आहे. हा रस्ता पूर्वीपासूनचा वहिवाटीचा सरकारी रस्ता आहे. या रस्त्यावरून दैनंदिन शेकडो ग्रामस्थ व शेतकरी, तसेच शाळेतील मुले यांची ये – जा असते. परंतु, शिव रस्त्याचे लगत असणारा अनगरे हद्दीतील शरद बाबुश्या परकाळे, युवराज बाबुश्या परकाळे, नीलेश वंसत थोरात (रा. अनगरे) व कौठा हद्दीतील सागर उत्तम शिपलकर (रा. कौठा) या दोन्ही शेतकर्यांनी दोन्ही बाजूने शिव रस्ता जेसीबी मशिनच्या साहाय्याने चर खोदून पूर्णपणे बंद केला आहे.
त्यामुळे या भागातील शेतकर्यांना जाणे येण्याचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे इथापेवस्ती, ढोरे वस्ती, थोरात वस्ती, नलगे वस्ती, गिरमकर वस्ती येथील ग्रामस्थांना व मुलांना वृध्दाची येणे- जाणे मुश्कील झाले आहे, तसेच आरोग्य सेवा रस्त्याअभावी तत्काळ मिळत नाही, तसेच शेतातील अवजारे, शेतमाल वाहतूक करणे, वाहनांची मोठे गैरसोय होत आहे. या रस्त्याशिवाय आम्हाला पर्यायी वहिवाटीसाठी रस्ता नाही, तरी अनगरे – कौठा शिव रस्त्याची श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी पाहणी करून आमचा पूर्वीपासूनचा शासकीय नियमाप्रमाणे वहिवाटीचा रस्ता 15 दिवसांत खुला करून द्यावा, अन्यथा ग्रामस्थ कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता तहसील कार्यालयासमोर कुटुंबातील सदस्यांसह उपोषण करू, असे ग्रामस्थांनी सांगितले. यासाठी ग्रामपंचायतीने लेखी निवेदन प्रशासनाला दिले आहे.