नगर : डाव्या शेतमजूर संघटनेच्या वतीने निदर्शने
नगर, पुढारी वृत्तसेवा : श्रमिक-कष्टकरी व शेतमजूरांच्या विविध मागण्यांसाठी देशातील पाच डाव्या शेतमजूर संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन मागणी दिवस पाळण्यात आला. रोजगार, जमीन, घर, खाद्य सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, वेतन व सामाजिक न्याय विषयावरील विविध मागण्यांसाठी भाकप व शेतमजूर संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
डाव्या शेतमजूर संघटनांच्या वतीने मंगळवारी देशव्यापी मागणी दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात भाकपचे राज्य सचिव अॅड. सुभाष लांडे, महेबुब सय्यद, भैरवनाथ वाकळे, विलास साठे, नितीन वेताळ, चंद्रकांत माळी, तुषार सोनवणे, रामदास वागस्कर, दत्ता वडवणीकर, विजय केदारे, दीपक शिरसाठ, फिरोज शेख, सतीश निमसे, आकाश साठे आदी सहभागी झाले होते.
मनरेगा अंतर्गत सहाशे रुपये मजुरी व प्रति जॉब कार्डधारकास प्रतिवर्ष दोनशे दिवस काम देण्यात यावे, मनरेगा योजनेत काम करणार्या तांत्रिक कर्मचारी व अन्य कर्मचार्यांना नोकरीची हमी द्यावी, सर्व भूमिहिन, बेघरांना घरासाठी जागा, किचन गार्डन, शौचालय व जनावरांसाठा गोठा आदीसाठी किमान 5 लाख रुपये किंमतीचे घरकूल द्यावे, विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.