नगर : चालत्या कारमध्ये जोडप्याने घेतले पेटवून | पुढारी

नगर : चालत्या कारमध्ये जोडप्याने घेतले पेटवून

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : नवरा-बायकोचे कडाक्याचे भांडण झाल्याने, नवर्‍याने चालत्या कारमध्येच पेटवून घेतले. त्यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर, कार जळून खाक झाली आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावरील बाभुळवेढे शिवारात शनि चौथर्‍याजवळ मंगळवारी (दि.26) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

कारमधील भाजलेल्या जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पुणे येथे हलविण्यात आले असून, यामध्ये महिलेचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिक सविस्तर माहिती मिळू शकली नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी पहाटेच्या सुमारास नवरा-बायको औरंगाबादहून पुण्याच्या दिशेने कारमधून चालले होते.

चालत्या गाडीतच त्यांच्यात कडाक्याचे भांडण चालू होते. बाभुळवेढे शिवारात शनि चौथर्‍याजवळ आल्यानंतर वैतागलेल्या नवर्‍याने चालू गाडीतच पेटवून घेतल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित आलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीवरून समोर येत आहे. यामध्ये दोघांनाही गंभीर इजा झालेली असून, यातील महिला मयत झाल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महामार्गावर कार जळून बेचिराख झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल नसल्याने घटनेचा खरा उलगडा झाला नाही.

Back to top button