निळवंडे कालव्यांमधून डिसेंबरपर्यंत पाणी सोडू, गोदावरी पाटबंधारे विभागाकडून औरंगाबाद खंडपीठामध्ये शपथपत्र दाखल
औरंगाबाद : निळवंडे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांचे बांधकाम पूर्ण करून, चाचणी घेऊन डिसेंबर 2022 पर्यंत पाणी सोडले जाईल, असे शपथपत्र गोदावरी पाटबंधारे महामंडळाने औरंगाबाद खंडपीठात सादर केले. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता व न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे यांनी ते स्वीकारून, 22 ऑक्टोबर 2022 रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.राहाता आणि कोपरगाव येथील विक्रांत रूपेंद्र काळे व इतर यांनी अॅड. अजित काळे यांच्यामार्फत दाखल केलेल्या
याचिकेच्या अनुषंगाने गोदावरी महामंडळातर्फे अॅड. बी. आर. सुरवसे यांनी धरणाच्या दोन्ही कालव्यांच्या बांधकामाचा अहवाल शपथपत्राद्वारे खंडपीठात सादर केला. धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांद्वारे पाणी सोडल्यास अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता आणि राहुरी तालुक्यांसह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील 182 गावांना निळवंडे धरणाचे पाणी मिळेल.