नगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली पावसामुळे ठिक-ठिकाणी चिखल तयार होऊन दुचाक्या घसरत आहेत. बुधवारी अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले. काही दिवसांपासूनच्या पावसामुळे शहरातील रस्ते चिखलमय झाले आहेत. उड्डाणपुलाखाली जिल्हा बँकेसमोर, तसेच कोठी येथे मोठा चिखल झाला आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे रस्ते चिखलमय असून अपघात होत आहेत. उड्डाणपुलाखाली दुभाजक लावण्यात येत आहेत. त्याकरिता मुरूम, मातीची वाहतूक होत असून त्यामुळे रस्त्यावर बर्याच प्रमाणात चिखळ तयार झाला आहे. रस्ते चिखलमय झाल्याने अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होत आहेत.वाहने स्लिप होऊन झालेल्या अपघातामध्ये बर्याच जणांना गंभीर दुखापत झाली असून काही जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघात रोखण्यासाठी निसरड्या रस्त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नगरकरांकडून होत आहे.
उड्डाणपुलाखालून वाहने नेत असताना झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना जबर दुखापत झाली आहे. या अपघाताची दखल घेत नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी बुधवारी कोठी चौकात उभे राहून वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन केले व वाहतूक नियंत्रणासाठी मदत केली.
शहरात अनेक दुचाकीस्वारांचा रस्त्यावरिल चिखलामुळे अपघात झाल्याने महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाकडून रस्ता साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.