राहुरी, पुढारी वृत्तसेवा : राज्यात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांकरिता आदर्शवत असणारी 14 गावे व बारागाव नांदूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला काही दिवसांपासून अनेक अडचणींनी ग्रासल्याचे चित्र आहे. महिन्यातून साधारण 8 ते 10 दिवस वेगवेगळ्या कारणाने पाणी पुरवठा बंद करणार्या पाणी योजना पदाधिकारी व अधिकार्यांनी थकबाकीमुळे बंद करण्याचा फर्मान काढले आहे.
बारागाव नांदूर पाणी व इतर 14 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही स्व. शिवाजीराजे गाडे यांच्या कालखंडात अग्रेसर राहिली. राज्यातील अनेक प्रादेशिक पाणी पुरवठा संस्था अडचणीत आल्यात. परंंतु स्व. गाडे यांच्या शिस्तबद्ध कार्यप्रणाली व लाभार्थी ग्रामस्थांशी असलेला संपर्क पाहता प्रतिकूल परिस्थिती असतानाही योजनेने 1 कोटी रुपये ठेव जमविण्यात यश मिळविले होते. राज्यात आदर्शवत असलेल्या या योजनेची दखल राज्यातील राजकीय नेत्यांसह अधिकार्यांनीही घेतली होती. नफ्यात योजना कशी चालवावी. याचे मूर्तिमंद उदाहरण म्हणून बारागाव नांदूर पाणी योजनेचे नाव घेतले जात होते.
गेल्या काही दिवसांपासून संबंधित पाणी योजना कोणत्या न कोणत्या कारणास्तव चर्चेत रहात आहे. नफ्यातली योजना असतानाही पाणी योजनेचे भवितव्य हे किरकोळ डागडुजी करण्याकडेच अधिक लक्ष दिले जात आहे. वेळोवेळी लिकेज काढण्यासाठी पाणी योजना बंद ठेवण्याचे अनेक प्रकार घडत आहे. महिन्यातील आठ ते दहा दिवस पाणी योजना बंद ठेवली जाते. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये वसुली करण्यासाठी पाणी योजनेचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. परंतु, त्यावेळी बंद दाराआड चर्चा करून पुन्हा योजना सुरळीत करण्यात आली.
पाणी योजनेची वसुली होत नसल्याचे कारण सांगत नुकतेच पाणी योजनेचा पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी दिली आहे. दरम्यान, नेमकी कोणत्या गावाकडे किती बाकी? याची माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न केले असता त्याच्या उत्तराबाबत चालढकल केल्याचे दिसून आले. पंचायत समितीचे पाणी पुरवठा अधिकारी श्रीरंग गडधे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी योजना सचिव ग्रामविकास अधिकारी गागरे यांच्याकडे माहिती विचारण्याचा सल्ला दिला. सचिव गागरे यांना थकबाकी व पाणी पुरवठा ठप्प केल्याची माहिती विचारली असता त्यांनी ज्या गावांकडे बाकी आहे, अशा चार गावांचा पाणी पुरवठा बंद केल्याचे सांगितले. परंतु, माझ्याकडे थकबाकीचा तपशील नसून माहिती घेतल्यानंतर दोन दिवसांत सांगतो, असे सांगितले. जि. प. सदस्य गाडे यांच्याकडे थकबाकीचा तपशील विचारला असता ती माहिती सचिव गागरेंकडेच असल्याचे सांगितले.
पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, सचिव व अध्यक्ष यांसह योजनेचे सदस्य प्रभाकर गाडे यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही योजनेविषयी कोणतीही माहिती आपल्याला दिली नसल्याचे सांगितले. त्यामुळे कोणत्या गावाकडे किती थकबाकी आहे व नेमक्या कोणत्या गावाचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. याबाबत मिळालेल्या उत्तरांमध्ये तफावत असल्याने पाणी योजनेचा वरून कीर्तन आतून सुरू असलेला तमाशा कळेनासा झाला आहे. पाणी योजना किती दिवस बंद ठेवणार? ग्रामपंचायत प्रशासनाकडून वसुली कशी केली जाणार? याबाबत प्रश्नांचा भडीमार पाणी योजना पदाधिकार्यांकडे केला जात आहे.
बारागाव नांदूर व इतर गावांच्या पाणी योजनेबाबत योजनेचे अध्यक्ष, सदस्य व सचिव यांपेक्षा कर्मचारीच जास्त अधिकार गाजवत असल्याचे चित्र आहे. पाणी बंद केल्यानंतर कर्मचारी ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकार्यांना बोलण्यापेक्षा ग्रामस्थांनाच खरी खोटी सुनावण्यात धन्यता मानत आहेत. पाणी योजना ही अधिकारी व पदाधिकारी चालवितात की कर्मचारी चालवितात? असा प्रश्न केला जात आहे.