वाळकी : अल्पवयीन मुलीचे चिचोंडीतून अपहरण | पुढारी

वाळकी : अल्पवयीन मुलीचे चिचोंडीतून अपहरण

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : शाळेत गेलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिघा जणांनी भरदिवसा अपहरण केल्याची घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात घडली आहे. मुलीचे अपहरण करणारे आरोपी गावातीलच असल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला असून, या प्रकरणी एका महिलेसह दोन तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिचोंडी पाटील गावच्या शिवारात राहणारी अल्पवयीन मुलगी गावातीलच शाळेत इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत होती. मंगळवारी (दि.5) सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी 10.30 च्या सुमारास शाळेत गेली. शाळेची वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत असल्याने ती साधारण 6 वाजेपर्यंत घरी पोहचत असते. मात्र, त्या दिवशी खूप उशीर झाला तरी, ती घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही.

दरम्यान, गावातील एक विवाहित महिला आणि दोन तरुणही त्याच दिवशी गावातून गायब झालेले आहेत. त्यामुळे सदर मुलीला या तिघांनी फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. त्यांनी बुधवारी (दि.6) दुपारी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी असलेली एक विवाहित महिला, तसेच सोमनाथ दत्तू धुळे, श्रावण संजय गायकवाड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button