नगर : 264 ग्रामपंचायतींची आरक्षणासह प्रभागरचना
नगर, पुढारी वृत्तसेवा: जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या जिल्ह्यातील 264 ग्रामपंचायतींची आरक्षणासह अंतिम प्रभागरचना प्रसिध्द करण्यात आली आहे. यापैकी 56 ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रमही सुरु आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम हाती घेतला. आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने 27 मे 2022 रोजी ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागरचना प्रसिध्द केली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेच्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 20 जूनला जिल्हा प्रशासनाने अंतिम प्रभागरचना आरक्षणासह प्रसिध्द केली आहे. आरक्षण सोडतीमुळे 264 गावांतील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात 56 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या हालचाली आयोगाने सुरु केल्या आहेत.

