संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, टोमॅटो, मका, डाळिंब आणि झेंडूची फुले व इतर 430 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर 18 घरांची अंशतः पडझड झाली असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांची खरीपावरच भिस्त अवलंबून होती. मात्र खरीपाची पिके काढणीला आली आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली.
या अवकाळी व गारपिटीने शेतकर्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. त्यामुळे बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे. लागोपाठ बळीराजाला नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यातून सावरत असतानाच आता निसर्गाने रब्बी पिकांवरही घाव घातल्यामुळे राज्यासह तालुक्यातील बळीराजा अक्षरशः उध्वस्त झाला आहे. सध्या तालुक्यातील बहुतेक भागात उन्हाळ कांदा काढण्याचे काम सुरु असतानाच अवकाळीने हजेरी लावल्याने शेतकर्यांना काढून ठेवलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचीही संधी मिळाली नाही.
संगमनेर तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वादळवार्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. मात्र या पावसाने मोठ्या प्रमाणात निमगाव खुर्द व बुद्रुक, सावरचोळ, पेमगिरी, नांदुरी दुमाला, अंभोरे व कोळवाडा या भागातील उन्हाळ कांदा, टोमॅटो, झेंडू, मका, डाळींब यासह भाजीपाला व चारा पिकांचे सुमारे 430 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही भागातील काढलेल्या गव्हाची पिकंही या पावसात भिजले आहे.
माजीमंत्री थोरात यांची पंचनामे करण्याची सूचना
संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या गारपीटग्रस्त भागाची सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात सोमनाथ गोडसे, बाळासाहेब कानवडे, संजय कानवडे, मनीष गोपाळे, भास्कर गोपाळे, अॅड. मिनानाथ शेळके, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, कृषी सहाय्यक यांनी पाहणी केली. प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेत पिकांची पाहणी करून पंचनामे करावे, अशा सूचना काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेआबाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिले असल्याचे सहकार महर्षीभाऊसाहेब थोरात साखर कारखा न्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी सांगितले.