

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातील संगमनेरच्या काही भागासह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणारे भोजापूर धरण रविवारी (दि.17) पहाटे 100 टक्के भरले. त्यामुळेे लाभधारक बळीराजा काहीसा सुखावला आहे. दरम्यान, सुमारे 540 क्यूसेकने सांडव्यावरुन म्हाळुंगी नदीपात्रात ओव्हर फ्लो सुरू करण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यातील निमोण -तळेगाव पंचक्रोशीसाठी काहीअंशी संजीवनी ठरलेल्या म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणाची एकूण साठवण क्षमता 483 आहे. मृत साठा 105 दशलक्ष घनफूट, तर उपयुक्त पाणीसाठा 361 दशलक्ष घनफूट आहे. भोजापूर धरणाखालील 19 किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याद्वारे दोडी शाखा व नांदूर शिंगोटे शाखा कालव्याद्वारे अनुक्रमे सिन्नर तालुक्यातील दहा गावांना व संगमनेर तालुक्यातील निमोणसह पाच गावांना शेतीच्या सिंचनासाठी पाणीपुरवठा होतो.
सिन्नर व संगमनेर तालुक्यातील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांमार्फत पिण्याचे पाणी पुरविले जाते. या धरणातून नाशिक जलसंपदा विभागाकडून मान्यताप्राप्त खरीप व रब्बी हंगामाकरिता उपसा सिंचन योजनांद्वारे सुमारे 100 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर केला जातो. परिणामतः मूळ प्रकल्पाचा पाणी साठा व सिंचन क्षेत्रात घट होत असल्याचे दिसते.
कालव्याद्वारे शेतीच्या सिंचनासाठी सातत्याने अडचणी निर्माण होतात. याकरिता भोजापूर धरणस्थळी मंजूर वॉटर प्लॅनिंग नुसार सुमारे 200 दशलक्ष घनफूट येवा (यिल्ड) उपलब्ध असताना धरणाच्या सांडव्याची उंची किमान एक मीटरने वाढविण्याची मागणी सातत्याने लाभक्षेत्रांमधून केली जात आहे. मात्र, शासनाकडून याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.
भोजापूर डाव्या कालव्यावर व वितरिकांवरील बांधकामे बहुतांश नादुरुस्त झाली आहेत. ही बांधकामे तातडीने दुरुस्त करावीत, अशी मागणी गेल्या 7 वर्षांपासून लाभधारक शेतकर्यांकडून निवेदनाद्वारे केली जात असल्याचे भाजपा अभियांत्रिकी सेलचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी व नाशिक पाटबंधारे विभागाविषयी लाभक्षेत्रातील शेतकरी व जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
भोजापूर पूरचारीचे (16 किलोमीटर लांबी व 45 क्यूसेक विसर्ग वाहन क्षमता असलेली) काम पूर्ण होऊन पाच ते सात वर्षे झाली आहेत. तथापि, अद्याप भोजापूरचे ओव्हर फ्लोचे पाणी तळेगाव दिघेपर्यंत पोहोचले नसल्याने या भागातील जनतेत मोठी नाराजी आहे. यावर्षी लवकरात-लवकर भोजापूर धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे तळेगाव परिसरातील जनतेच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत.
सुदैवाने यावर्षी भोजापूर धरण जुलैमध्येच ओव्हर फ्लो झाल्याने पुढील दोन ते अडीच महिन्यांच्या पावसाळी कालावधीमध्ये सिन्नर व संगमनेर तालुक्यातील लघू पाटबंधारे तलाव, पाझर तलाव, गावतळे, दगडी व काँक्रिट साठवण बंधारे ओव्हर फ्लोच्या पाण्याने भरून देण्याची चकोर यांनी मागणी केली आहे.