नगर : तांदुळवाडी ग्रामपंचायतीमध्ये घडले सत्तानाट्य

राहुरी : तांदुळवाडी ग्रामपंचायतीवर तनपुरे गटाने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर जल्लोष करताना सदस्य.
राहुरी : तांदुळवाडी ग्रामपंचायतीवर तनपुरे गटाने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर जल्लोष करताना सदस्य.
Published on
Updated on

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडीत नाट्यमय घडामोडी घडल्या. विखे गटाने अचानकपणे तनपुरे गटाला पाठिंबा दिल्याने माजी आमदार कर्डिले गटाचे तीन सदस्य एकाकी पडले. ऐनवेळी घडलेल्या सत्ता नाट्यामध्ये सरपंचपदी गायत्री अमोल पेरणे यांची, तर उपसरपंचपदी अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर ईश्वर खिलारी यांची निवड झाली.

तांदुळवाडी ग्रामपंचायतीमध्ये आ. प्राजक्त तनपुरे यांच्या राष्ट्रवादी गटासह माजी आमदार शिवाजी कर्डिले गटाने युती करीत 'जय तुळजा भवानी परिवर्तन' मंडळाच्या बॅनरखाली निवडणूक लढविली होती. विरोधात विखे गटाकडून तान्हाजी धसाळ यांच्या नेतृत्वामध्ये 'जय तुळजा भवानी शेतकरी मंडळ' यांनी लढत दिली. निवडणुकीमध्ये तनपुरे-कर्डिले गटाने 9 जागा जिंकत एकहाती वरचष्मा राखला होता, तर विरोधी गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. तर अपक्ष दोन उमेदवारांनी विजयी पताका झळकावली.

कर्डीले गटाचे उमेदवार पडले एकाकी

दरम्यान, तनपुरे-कर्डिले गटाने आपल्या सर्व सदस्यांना कोणताही दगा फटका होऊ नये म्हणून हनुमान मंदिरात शपथ देत सहलीला पाठविले होते. त्यामुळे तनपुरे-कर्डिले गटामध्ये सत्ता वाटप होईल, असे चित्र होते. सरपंच निवडीच्या दिवशी सत्तानाट्यामध्ये एकमेकांच्या विरोधात लढलेल्या तनपुरे-विखे व अपक्ष गटाने एकी केली. यामध्ये कर्डिले गटाचे तीन सदस्य हे एकाकी पडले. निवडणूक निर्णयाधिकारी मंडलाधिकारी टी. बी. शिंदे व सहाय्यक ग्रामसेवक अमोल साळवे यांच्या उपस्थितीत निवड झाली. यामध्ये गुप्त मतदान होऊन सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या गायत्री पेरणे यांना 9 मते मिळाली, तर विरोधात स्वाती विनित धसाळ यांना 4 मते मिळाली. यामध्ये गायत्री पेरणे यांनी सरपंचपद मिळविले. उपसरपंच्या निवडीत अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर खिलारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तनपुरे गटाचे नेतृत्व इंद्रभान पेरणे यांनी केले. कर्डिले गटाला एकाकी पाडण्यासाठी विखे गटाने तनपुरे गटाला दिलेल्या पाठिंब्याची मोठी चर्चा होत आहे. यासह दोन अपक्ष उमेदवारांनीही तनपुरे-विखे गटात सामील होत सत्तेत सहभाग घेतला. कर्डिले गटाकडून स्वाती धसाळ, अश्विनी मच्छिंद्र चव्हाण, शिवाजी लक्ष्मण खडके यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. तनपुरे-विखे-अपक्ष गटाकडून ज्येष्ठ सदस्य निसारभाई सय्यद, शितल पेरणे, विक्रम पेरणे, विमल पेरणे, गणपत पेरणे, विराज धसाळ, अनिता निकम, शीतल आढाव हे सत्ताधारी गटाकडून राहिले.

निवडीनंतर जल्लोष साजरा करण्यात आला. दोन्ही पदाधिकार्‍यांची मिरवणूक काढल्यानंतर सभेत रुपांतर होऊन तान्हाजी धसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब पेरणे, इंद्रभान पेरणे, निसारभाई सय्यद, गहिनीनाथ पेरणे यांनी मनोगत व्यक्त केले.

नेमकं मत फुटलं कोणाचं?

विरोधी भाजपचे तीन सदस्य असताना सरपंच पदासाठी उभ्या राहिलेल्या भाजप गटाच्या स्वाती धसाळ यांना चार मते मिळाली. त्यामुळे तनपुरे-विखे व अपक्ष गटामध्ये नेमकं मत कोणाचं फुटल? अशी चर्चा तांदुळवाडी ग्रामस्थांमध्ये रंगली होती. अनोख्या सत्तानाट्याची संपूर्ण तालुक्यात चर्चा झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news