पीक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांचे आधार कार्ड व बँक खात्यात बहुतेक नावे सारखी असतात. परंतु, सात/बारा उताऱ्यावर कधी कधी नावात किरकोळ बदल असतो. असे असले तरी विमा अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचा निर्वाळा कृषी आयुक्तालयाने दिला आहे.
मात्र, नावात थोडासा बदल असल्यास हरकत नाही. परंतु, पूर्ण नाव, आडनाव वेगळे असल्यास चालणार नाही. पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी आधार कार्ड, बँक खाते व सात/बारा उतारा यावर नाव एकसारखे असणे आवश्यक आहे.
मात्र, यात किरकोळ जरी बदल असेल, तरी विमा योजनेत सहभागी होता येणार नाही, अशा आशयचा मेसेज व्हॉट्स अॅपद्वारे फिरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
नावात असलेला बदल विमा कंपनीमार्फत तपासला जाईल आणि तपासणी अंती अर्ज स्वीकृतीबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून जाऊ नये. मात्र, शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाचा आणि लागवड असलेल्या क्षेत्राचाच विमा घ्यावा. विमा घेतलेले पीक प्रत्यक्षात शेतात आढळले नाही, तर विमा अर्ज नामंजूर होईल.
शेतकऱ्यांनी आपली ई- पीक पाहणी शक्यतो ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करावी. दरम्यान, राज्यात दि.२ जुलै २०२४ पर्यंत सुमारे ५७ लाख विमा अर्ज प्राप्त झाले आहेत. खरीप हंगामात विमा कृषी विभागाचे स्पष्टीकरण घेण्यासाठीचा अंतिम दिनांक १५ जुलै २०२४ आहे.
उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा तातडीने उतरवून घेण्याचे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विनयकुमार आवटे यांनी केले आहे. सामायिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपयाप्रमाणे शुल्क देणे अपेक्षित आहे.
यासाठी शेतकऱ्याने स्वतःचा सातबारा, आठ अ उतारा व इतर कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्काची मागणी सामायिक सुविधा केंद्रचालकाने केल्यास याबाबत तक्रार खालील टोल फ्री क्रमांक वर करण्यात यावी. त्याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल.