पुढारी ऑनलाईन डेस्क: नैऋत्य मान्सूनचे गुरूवार ६ जून रोजी दक्षिण कोकणात आगमन झाले. आज सकाळपर्यंत तो रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत सरकला (Monsoon in Mumbai) आहे. मान्सूनची आगेकूच सुरूच असून, शनिवार (९ जून) ते रविवारपर्यंत (दि.१० जून) तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीसाठी पुढील ४ दिवस अनुकूल आहेत. मान्सून ९ ते १० जूनच्या सुमारास मुंबईत येण्याची शक्यता (Monsoon in Mumbai) आहे. या संदर्भातील माहिती भारतीय हवामान विभागाचे मुंबईचे हवामानशास्त्र महासंचालकांनी दिली आहे.
चार दिवसांपासून गोव्यात अडकलेला मान्सून गुरुवारी (दि. 6 जून) दुपारी तीन वाजता तळकोकण ओलांडून पुढे आला. त्याने दुपारी चारपर्यंत रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर शहरे काबीज केली होती. आगामी काही तासांत तो पुणे, मुंबई शहरात दाखल होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्याला यलो अलर्ट हवामान विभागाने दिला असून, 7 ते 9 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. हवेचे दाब अनुकूल होताच मान्सून गुरुवारी राज्यात रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांंगली शहरांत दाखल झाला. तशी अधिकृत घोषणा हवामान विभागाने गुरुवारी दुपारी 4 वाजता केली. आगामी 12 ते 16 तासांत तो पुणे, मुंबई शहरात दाखल होईल, असा अंदाज आहे.