

जळगाव : पुढारी ऑनलाइन डेस्क वृत्तसेवा – जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विजयाचा गुलाल उधळला आहे. महायुतीच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी सुमारे दोन लाख मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जळगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अर्थात भाजपमधून उमेदवारी डावललेल्या माजी खासदार उन्मेष पाटील यांना हा मोठा धक्का लागला आहे.
महायुतीच्या स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीचे करण बाळासाहेब पाटील-पवार यांच्यापैकी नेमकी कुणाची सरशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. करण पाटील-पवार यांना जळगाव मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचाराचा धुरळा उडवून दिल्यामुळे आधी भाजपसाठी सोपी वाटणारी निवडणूक अंतिम फेरीपर्यंत मोठ्या चुरशीची बनलेली असताना स्मिता वाघ यांनी आघाडी घेतली.
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील-पवार यांना ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. त्यांच्यासाठी थेट उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभा घेतल्यानंतर निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती. भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराची धुरा शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे आमदार सुरेश भोळे आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार-पदाधिकार्यांनी सांभाळली. ही निवडणूकीत मोठ्या काट्याची टक्कर झाली.
आज मंगळवारी (४ जून) रोजी सकाळी आठ वाजता जळगाव मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली. यात भाजपच्या उमेदवार वाघ यांना प्रत्येक फेरीत मतैधिक्य वाढत होते. दुपारी तीनपर्यंत त्यांनी दीड लाखापेक्षा अधिक मतांनी आघाडी घेतली. आतापर्यंत त्यांना ५ लाख १० हजार ४७२ मते मिळाली आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील- पवार यांना तीन लाख १४ हजार ६७० मते मिळाली आहे. त्याअनुषंगाने स्मिता वाघ यांनी तब्बल दोन लाख मतांनी आघाडी घेतली असून, त्यांनी विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव व पाचोरा या विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यातील जळगाव शहर, चाळीसगावात भाजपचे, तर जळगाव ग्रामीण, एरंडोल व पाचोरा येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. अमळनेरला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, पाचोर्यात किशोर पाटील व एरंडोलमध्ये चिमणराव पाटील आमदार असल्याने येथे शिंदे गटाची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. जळगाव लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला आहे. गेल्या २० वर्षांपासून जळगावात भाजपचा खासदार आहे.
हेही वाचा: