![चांदवड : गेल्या महिनाभरापासून नळाला पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी तळवाडे ग्रामपंचायती समोर मांडलेला ठिय्या. (छाया : सुनील थोरे)](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F05%2F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
चांदवड (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा – गेल्या महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांचा उद्रेक झाला. संतप्त शेतकऱ्यांनी हंडे घेऊन तालुक्यातील तळवाडे येथील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नळाला पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यांनतर संतप्त नागरिकांनी मोर्चा मागे घेतला.
तालुक्यातील तळवाडे ग्रामपंचायतीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे ओझरखेड धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या महिनाभरापासून एमजीपीद्वारे तळवाडे गावाला पाणीपुरवठा केला गेला नाही आहे. आज नळाला पाणी येईल, उद्या पाणी येईल या आशेपोटी आज तब्बल एक महिना लोटला तरीदेखील नळाला पाणी न आल्याने संतप्त तळवाडेकरांनी बुधवारी (दि.२९) तप्त उन्हात हंडा मोर्चा काढीत थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. यावेळी एमजीपी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. यावेळी सरपंच संदीप जाधव यांनी एमजीपीचे कनिष्ठ अभियंता बिरारी यांच्याशी फोनवर संवाद साधत संतप्त नागरिकांच्या भावना कळविल्या. यावेळी बिरारी यांनी गुरुवारी (दि. ३०) सकाळपर्यंत तळवाडे गावाला पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे तूर्तास नागरिकांनी काढलेला हंडा मोर्चा नागरिकांनी मागे घेतला. या हंडा मोर्चात संतोष काटे, दीपक भोयटे, ज्ञानेश्वर भोयटे, विजय नादे, भूषण भोयटे, कृष्णा भोयटे, रविंद्र काटे, दिलीप चव्हाण, हरी चव्हाण, राधा गांगुर्डे, सरला भगरे, कविता पवार, ज्या भगरे, ज्योती अहिरे, शीतल काटे, कुंदा गांगुर्डे, परीघा काटे, राधा चव्हाण, अलका भगरे, मीराबाई क्षीरसागर, ताईबाई भगरे आदीसह महिला व पुरुष सहभागी झाले होते.
हेही वाचा: