कोकण वगळता राज्यात ‘या’ भागात उष्णतेची लाट; अकोला, परभणी 45 अंशांवर

कोकण वगळता राज्यात ‘या’ भागात उष्णतेची लाट; अकोला, परभणी 45 अंशांवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अकोला, यवतमाळ आणि परभणी शहरांचा पारा रविवारी 45 अंशांवर गेला. जळगावच्या तापमानात किंचित घट होऊन तो 43.8 अंशांवर आला होता. राज्यात 1 जूनपर्यंत उष्णतेची लाट सक्रिय राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, कोकणसह उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांत अवकाळीच्या स्थितीबरोबरच 1 जूनपर्यंत उष्णतेची लाट सक्रिय राहील, असा अंदाज आहे. रविवारी जळगावचा पारा 45.8 वरून 43.8 अंशांवर खाली आल्याने हायसे वाटले. मात्र, अकोला (45.6), यवतमाळ (45.5), परभणी (45.2) शहरांतील तापमानात मोठी वाढ झाली आहे. अजून आठ दिवस कमाल तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

रात्रीचा उकाडाही वाढला…

कोकण वगळता महाराष्ट्रात सध्याचे दुपारचे कमाल तापमान 40 ते 44 अंश तर पहाटेचे किमान तापमान हे 28 ते 30 अंश सेल्सिअस इतके नोंदवले. सरासरीपेक्षा कमाल 3 ते 4 तर किमान 4 ते 5 अंशांनी अधिक राहण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही अधिक जाणवेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

रविवारचे कमाल तापमान

अकोला 45.6, यवतमाळ 45.5, परभणी 45.2, पुणे 35.9, नगर 39.9, कोल्हापूर 32.7, महाबळेश्वर 26.1, मालेगाव 41.8, नाशिक 37.3, सांगली 32.1, सातारा 32.6, सोलापूर 38.2, छत्रपती संभाजीनगर 42.8, नांदेड 43.8, अमरावती 44.4, बुलडाणा 40.6, ब्रह्मपुरी 44, चंद्रपूर 43.4, गोंदिया 40.2, नागपूर 41.7, वाशिम 43.8, वर्धा 44.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news