Jalgaon Police Transfer and Ramdev wadi case: एमआयडीसी पोलिसांना व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न? | पुढारी

Jalgaon Police Transfer and Ramdev wadi case: एमआयडीसी पोलिसांना व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न?

जळगाव – पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील रामदेववाडी या ठिकाणी 7 मे रोजी कार व मोटरसायकल अपघात झाला होता. यामध्ये आई दोन मुले व एक भाचा यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला. या अपघातातील आरोपीच्या वाहनात गांजा सदृश नशेचे पदार्थ आढळले होते. त्याबाबतही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपीने उपचाराच्या नावाखाली मुंबईत रुग्णालयात ठाण मांडले. आरोपीस अटक न करता 17 दिवसांनी पुण्याच्या प्रकरणावरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यावर हे प्रकरण शेकले जात आहे. तत्काळ तपासी अंमलदार बदलून डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे संपूर्ण प्रकरण सोपवण्यात आलेले आहे. तपासी अधिकारी का बदलण्यात आला. पहिल्याच दिवशी तो सक्षम अधिकारी त्या ठिकाणी का देण्यात आला नाही असे विविध प्रश्न समाेर येत आहे.

जळगाव जिल्ह्यात पोलीस दलाचे खांदे बदल झाल्यापासून अनेक घटना घडत आहेत. त्यात खून, दरोडे, चोऱ्या व भर दिवसा घरफ ड्या यांचे प्रमाण वाढत आहे. ७ मे २०२४ रोजी रामदेववाडी या गावाजवळ मोटरसायकलवर कार अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आशावर्कर आई व दोघे मुलं घटनास्थळी मृत झाली होती. उपचारादरम्यान भाचा ही मृत्यू झाला होता. यानंतर एमआयडीसी पोलिसांकडे असलेल्या तपास संशयाच्या सुईत आला. आरोपी हे राजकीय व मोठे व्यापाऱ्यांचे अपत्ये असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नागरिकांनी आवाज उठवला. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की आरोपीस डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यानंतर अटक करण्यात येईल. या प्रकरणी आरोपी दोघांपैकी एकाची रक्त तपासणी जळगावला तर दुसऱ्याची पारोळा येथे रक्तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहे. मिळालेल्या सूत्रांकडून अजूनही त्यांचे अहवाल पोलिसांना प्राप्त झालेले नाही. जळगाव मध्ये सर्व सुविधा उपलब्ध असताना मुंबईलाच उपचारासाठी  कारवाई केली जात आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे.

त्यातच पुणे येथील पोर्शे कार अपघाताची घटना झाल्यानंतर जनतेचा आक्रोशामुळे रामदेववाडी प्रकरण जळगाव पोलिसांच्या अंगावर शेकले जाऊ शकते. या अंदाजानेच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी अचानक या घटनेतील तपासी अंमलदार बदलून डी वाय एस पी संदीप गावित यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.

या घटनेतील आरोपी बड्या नेत्याचा मुलगा

घटनेतील एक आरोपी हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांचा मुलगा आहे. दुसरा व्यावसायिक तसेच अनिल भाईदास पाटील यांचे स्वयंघोषित पी.ए. म्हणून घेणाऱ्या व्यावसायिक कौल यांचा मुलगा अर्णव अभिषेक कौल आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हालचाली होऊ लागल्याने इतर मात्र बघ्याची भूमिका घेत होते.

17 दिवसानंतर डी वाय एस पी संदीप गावित यांच्या तपासानंतर आरोपीस डॉक्टरांनी सुट्टी दिल्यानंतरच अटक होणार आहे. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी तपास काय केला हा प्रश्न उपस्थित होत आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची वर्णी एलसीबीला होणार असल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यात सुरू झालेली आहे. त्यांनी हा तपास स्वतःकडे का ठेवला नाही. ज्या प्रकरणात राजकारण व चार जणांचा मृत्यू झाला. तो एका एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याकडे का सोपवला गेला असे विविध प्रश्न निर्माण होत आहेत.

याबाबत डीवायएसपी संदीप गावित यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अपघात झाल्यानंतरच अपघातग्रस्तांच्या दिलेल्या फिर्यादीनुसार सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा म्हणजे 304 चे कलम लावलेले आहे. तसेच आरोपींच्या चारचाकी वाहनात गांजा मिळून आला होता. त्यामुळे एन डी पी एस कलम ही लावण्यात आलेले आहेत. तो गांजा सी ए कडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेला आहे. प्रथमदर्शनी या अपघातामध्ये वाहन हे अर्णव अभिषेक कौल हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Back to top button