नाशिक: पुढारी ऑनलाइन डेस्क
८५० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन संदर्भातील घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामधून निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या भुजबळ यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली असून यााबातची सुनावणी १ एप्रिल रोजी होत आहे. याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.
दमानिया यांचे नेमके म्हणणे काय?
दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षापासून ८५० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या सुनावणीची तारीख दिली जातच नव्हती. तर न्यायाधिशांनी आपण या प्रकरणाची सुनावणी करणार नाही असे 'नॉट बिफोर मी' च्या माध्यमातून सांगितले जात होते. मात्र आता मुंबई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश चंद्रचूड यांनी दिले आहेत. त्यानुसार आज सोमवार, दि. १ एप्रिल रोजी या प्रकरणीची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होत आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात भुजबळांना ९ सप्टेंबर रोजी निर्दोष मुक्त करण्यात आलेले होते. भुजबळ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीच्या विशेष न्यायालयाकडे या प्रकरणातून दोषमुक्त करण्यात यावे यासाठी अर्ज केलेला होता. तसेच भुजबळांबरोबर त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनीही असा अर्ज दाखल केलेला होता. माझ्यावर झालेले आरोप हे निराधार, बिनबुडाचे असून मला दोषमुक्त करावे अशी मागणी भुजबळ यांनी केलेली होती. त्यानंतर भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेले होते. मात्र त्यानंतर अंजली दमानिया यांनी नव्याने मुंबई सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असल्याने अखेर दीड वर्षानंतर याचिकेच्या सुनावणीची तारीख मिळाली असल्याचे दमानिया यांनी सांगितले आहे.