होलिकोत्सव 2024 : होळीनिमित्त 'घीहर' च्या मिठाईला खास मागणी, खवय्यांची उडाली झुंबड
नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
होळीसाठी गेल्या पन्नास वर्षांपासून ‘घीहर’ हा जिलेबीचा प्रकार तयार करून वर्षातून फक्त चारच दिवस त्याची विक्री करण्याची परंपरा येथील चावला परिवाराने आजही अबाधित राखली आहे. या ‘घीहर’चे परदेशातही आकर्षण असून त्यास खास मागणी असते.
होळी व धूलिवंदन सणाला देवळाली कॅम्पमध्ये सर्वाधिक मागणी असलेली मिठाई म्हणून खास मैदा व उडीद डाळीच्या पिठापासून तयार केल्या जाणाऱ्या सिंधी बांधवांच्या ‘सिंधी घीहर’ अर्थात विशिष्ट प्रकारच्या जिलेबीचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. यावर्षी हा ‘घीहर’ थेट दुबई व लंडनसारख्या शहरांतदेखील पाठवण्यात येणार आहे.
देवळालीकर हा पदार्थ सणानिमित्त हमखास चाखतात. येथील सिंधी बांधवांमधील स्व. जीवनराम चावला यांनी स्थापन केलेल्या दुकानात मागील ७० वर्षांपासून चावला परिवाराने आपल्या पूर्वजांकडून कला आत्मसात करत खास होळीसाठी आपल्या मिठाई दुकानाच्या माध्यमातून ‘घीहर’ तयार करण्याचा उद्योग सध्या खुशाल व अनिल चावला यांनीदेखील सुरू ठेवला आहे. यासाठी त्यांना उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील कारागिरांची मदतही होते. जिलेबीचा विशिष्ट प्रकार यानिमित्ताने खवय्यांना चाखावयास मिळत असल्याने होळी व धूलिवंदनाच्या दिवशी लष्करासह देवळालीत सर्वधर्मीय नागरिक या ठिकाणी खास हजेरी लावतात.
जिलेबीचा विशिष्ट प्रकार यानिमित्ताने खवय्यांना चाखावयास मिळत असल्याने होळी व धूलिवंदनाच्या दिवशी लष्करासह देवळालीत सर्वधर्मीय नागरिक या ठिकाणी खास हजेरी लावतात. संपूर्ण बाजारपेठ बंद असली, तरीही येथील खवय्यांसाठी खुले असते. मूळ देवळालीकर असलेले मात्र व्यवसायानिमित्त परगावी राहात असलेले नागरिकही होळीच्या दिवशी खास घीहरचा आस्वाद घेण्यासाठी देवळालीत येतात. तसेच प्रत्येक सिंधी बांधव आपल्या मुलीच्या सासरी हा पदार्थ आवर्जून पाठवतात. नाशिक, नाशिक रोड, सिन्नर, ओझर, भगूर या परिसरांसह एअर फोर्स तसेच लष्करातील अधिकारी व जवान मुद्दामून या ठिकाणी घीहरची चव चाखण्याची हमखास येतात. दिवसभर या ठिकाणी खवय्यांची गर्दी होत असली, तरी कोणत्याही गोंधळ न होता, शांततेत सर्वांना या अनोख्या पदार्थाची चव चाखता येते. विशिष्ट पद्धतीने ही मिठाई तयार केली जात असल्याने याचा घमघमाट दरवळत असतो. अनेक नागरिक पाककला समजून घेण्यासाठी येतात. मात्र आपले खास गुपित ते कधीही उघड करत नाही. चावला यांच्या दुकानात गेल्या कित्येक वर्षांपासून उत्तर प्रदेश येथील कारागीर हा पारंपरिक पदार्थ तयार करतात.
होळीनिमित्त हा पाककलेचा नमुना गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या दुकानातून तयार केला जातो. मात्र त्याची विक्री वर्षभर न करता केवळ चार दिवस करण्याचा संकल्प पूर्वजांनी केला असल्याने ती परंपरा आम्ही जपत आहोत. हा पदार्थ तयार करण्यासाठी गव्हाचे पीठ, साखर, वेलची, दूध व इतर पदार्थांचा वापर केला जातो. ना नफा ना तोटा या तत्त्वावर ही मिठाई तयार केली जाते. – अनिल चावला.
हेही वाचा: