हुडहुडी वाढली ! राज्यातील किमान तापमानात 4 ते 6 अंशांनी घट

हुडहुडी वाढली ! राज्यातील किमान तापमानात 4 ते 6 अंशांनी घट

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दिवाळी संपताच राज्याच्या किमान तापमानात 4 ते 6 अंशांंनी घट होण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमान छत्रपती संभाजीनगर येथे 13.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. दरम्यान, बंगालच्या उपसागरात वार्‍याची चक्रीय स्थिती तयार झाली असून, उत्तर मध्य सागरात आगामी 24 तासांत चक्रीवादळ तयार होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदाच्या दिवाळीत राज्यात किमान तापमानाचा पारा सरासरी 18 ते 21 अंशांवर होता. यात गुरुवारी 4 ते 6 अंशांनी घट झाली अन् सायंकाळी 6 पासून थंडी सुटली. बोचरे वारे सुटले होते.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ
गुरुवारी दुपारी बंगालच्या पश्चिम मध्य उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्यास सुरुवात झाली. हे वादळ ओडिशापासून 220, तर विशाखापट्टणमपासून 420 कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे भारतीय किनारपट्ट्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, ओडिशा व आंध्र प्रदेश किनारपट्टीवर पाऊस वाढणार आहे. मात्र, महाराष्ट्रावर याचा परिणाम होणार नाही, असा प्राथमिक अंदाज आहे.

किमान तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
छत्रपती संभाजीनगर 13.4, पुणे 14.4, नगर 14.5, जळगाव 14.5, कोल्हापूर 18.5, महाबळेश्वर 14.9, नाशिक 14.2, सांगली 17.8, सातारा 15, सोलापूर 18.2, परभणी 16, नांदेड 17.2, बीड 15, अकोला 17.4, अमरावती 17.8, बुलडाणा 16.2, चंद्रपूर 16.8, गोंदिया 15.6, नागपूर 15.8, वाशिम 16.6, वर्धा 17.5, यवतमाळ 15.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news