बिपरजाॅय शमले, आता मान्सून वेग घेणार, राज्यात ढगांची गर्दी, गार वारेही सुटले

बिपरजाॅय शमले, आता मान्सून वेग घेणार, राज्यात ढगांची गर्दी, गार वारेही सुटले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आठ दिवस प्रवास करून कच्छ व सौराष्ट्र किनारपट्टीवर आदळलेल्या बिपरजॉय महाचक्रीवादळाचे रूपांतर शुक्रवारी सायंकाळी कमी दाबाच्या पट्ट्यांत झाले. त्यामुळे आता मान्सूनचा अडसर दूर झाला असून, मान्सून शनिवारी मुंबई, पुणे शहराच्या दिशेने निघेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश भागात ढगांची गर्दी होत असून, गार वारे सुटले आहे.

बिपरजाॅय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास थांबला होता. कारण या वाऱ्यांतील बाष्प चक्रीवादळाने पळवले व कमी दाबाचे पट्टेही तयार झाले नाहीत. शुक्रवारी सायंकाळी सर्वांत मोठ्या चक्रीवादळाने पाकिस्तानऐवजी गुजरातमध्येच प्रवास थांबवला. तेथेच त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. या वादळामुळे गुजरात व राजस्थान या दोन राज्यांत १९ जूनपर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे.

चक्रीवादळाचा वेग कमी होऊन ते शांत होत असतानाच मान्सूनच्या हालचाली महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू किनारपट्टीवर दिसू लागल्या असून, आज किंचित प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. शनिवारी तो राज्यातील मुंबई, पुणेसह आणि काही भागांत प्रगती करेल, असा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागांत शुक्रवारी सायंकाळी गार वारे सुटून काही भागात हलका पाऊस झाला. त्यामुळे उकाड्यापासून किंचित दिलासा मिळाला. पुणे शहरात दुपारी ४ वाजता ढग दाटून आले. तसेच हलका पाऊस झाल्याने मातीचा सुगंध दरवळू लागल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला.

विदर्भात उष्णतेची लाट

राज्यातील बहुतांश भागांचे कमाल तापमान हळूहळू कमी होत असून, गार वारे सुटून हलका पाऊस पडण्यास सुुरुवात झाली आहे. मात्र, संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, अजून आठ दिवस त्या भागात अशी स्थिती कायम राहणार आहे. विदर्भाचा पारा ४२ अंशांवर अजून कायम आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news