प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील उत्कृष्ट कामाबद्दल राज्याचा गौरव, केंद्र सरकारडून राज्याला प्रशस्तीपत्र
पुणे, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत महाराष्ट्राने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. देशात ही योजना राबविण्यात राज्य आघाडीवर आहे. योजनेतील 18 ते 20 टक्क्यांइतका वाटा एकट्या महाराष्ट्राचा असल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले.
छत्तीसगडमधील रायपूर येथे प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेस शुक्रवारी (दि.14) सुरुवात झाली. या कार्यशाळेत केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा, मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश चव्हाण, विविध विमा कंपन्यांचे अधिकारी, देशातील पिक विमा योजना राबविणार्या राज्यांचे वरिष्ठ अधिकारी, विमा प्राधिकरणच्या अधिकार्यांनी सहभाग घेतला आहे. पिक विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश चव्हाण यांचे हस्ते राज्याला प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे यांनी हे प्रशस्तीपत्रक स्वीकारले.
या बाबत कृषी आयुक्तालयातील सह संचालक विनयकुमार आवटे यांनी सांगितले की, राज्यात सन 2016-17 पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येते. सन 2016-17 ते खरीप 2022 अखेर राज्यातील शेतकर्यांनी खरीप आणि रब्बी हंगामातील विविध पिकांच्या विमा संरक्षणासाठी एकूण 3 हजार 949 कोटी रुपयांइतका विमा हप्ता भरलेला आहे आणि आत्तापर्यंत 22 हजार 347 कोटी रुपयांइतकी नुकसान भरपाई शेतकर्यांना मिळालेली आहे. राज्य सरकारने 14 हजार 643 कोटी आणि केंद्र सरकारने 14 हजार 192 कोटी रुपयांचा विमा हप्ता अनुदान आत्तापर्यंत दिलेले आहे.