शेतकऱ्यांच्या खात्यावर सात दिवसांच्या आत मदत, मुख्यमंत्र्यांचे अहमदनगरमध्ये आश्वासन | पुढारी

शेतकऱ्यांच्या खात्यावर सात दिवसांच्या आत मदत, मुख्यमंत्र्यांचे अहमदनगरमध्ये आश्वासन

अहमदनगर: जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे नऊ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली‌. नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येतील. त्यानंतर एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात मदत वितरित करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. .

आज मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला‌. त्यांच्या समस्या जाणून‌ घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच तातडीने उभारणी‌ करण्याचे आदेश दिले आहेत. गावात पडझड झालेल्या‌ २२ कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून तत्काळ पक्के घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यानी दिल्या. अवकाळी पावसाने वनकुटे गावातील घरांची पडझड झाली आहे‌. या पावसात कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. यानंतर शेतकरी बबनराव रामभाऊ काळे, भागा पायघुडे, बबन मुसळे व बाबाजी मुसळे यांच्या शेतीमधील कांदा, मिरची यासह डाळिंब, संत्रा, आंबे, या फळपिकांच्या नुकसानीची पहाणी करून झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

Back to top button