

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला महाराष्ट्राचे राज्यगीत (Maharashtra state song ) म्हणून स्वीकारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी, २०२३ पासून हे गीत राज्यागीत म्हणून अंगिकारण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज (दि.३१) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पण तुम्हाला माहित आहे का? या गाण्याचे बोल कोणाचे आहेत? कोणी गायले आहे आणि कोणी संगीत दिले आहे. (Maharashtra state song)
आज आज (दि.३१) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा'हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत असणार आहे. हे गीत गीतकवी राजा बढे यांनी लिहिलं आहे. श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिलं आहे तर शाहीर साबळे यांनी हे गीत गायलं आहे. हे गीत शाहीर साबळे यांनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा म्हणजे १ मे १९६० रोजी दादर (मुंबई) येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पहिल्यांदा गायलं होतं. शाहीर साबळे यांच्या खणखणीत आवाजानं हे गाण आजही लोकांच्या मनावर रुंजी घालतं.
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा IIIधृII
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा III१II
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा III२II
देशातील १२ राज्यांना स्वत:चं अधिकृत राज्यगीत आहे. त्यामध्ये छत्तीगसड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, मणिपूर, ओडिशा, पुद्दूचेरी, तामिळनाडू आणि उत्तरखंड या राज्यांचा समावेश आहे.
हेहा वाचा