

रायगड; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे.
गीते हे राजकीय वैफल्यग्रस्त असून त्यांची अवस्था मसांगताही येत नाही आणि सहनही होत नाहीफ अशी झाल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.
श्रीवर्धन येथे झालेल्या शिवसेनेच्या सरपंच-उपसरपंच मेळाव्यात गीते यांनी पवार यांच्यावर टीका केली.
त्यावर मंगळवारी तटकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर पलटवार केला. गीते बोलल्याने काही फरक पडत नाही परंतु सुर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. पवार हे देशाचे नेते तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे जनक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वच्छपणाने राज्याचे काम करत आहेत. कोविडसारख्या महामारीचा मुकाबला करणार्या ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारची प्रशंसा होत असताना अडगळीत पडलेल्या नेत्यांना या सार्या कृतीचे भान राहिले नाही, असाही टोला तटकरे यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी पक्ष हा सिध्दांत तसेच पवार यांच्या धर्मनिरपेक्ष विचारांवर चालणारा आणि शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास असणारा पक्ष आहे. देशाच्या जडणघडणीत पवार यांच्या उत्तुंग नेतृत्वामुळे राष्ट्रवादीचे अढळ स्थान कोणी बोलल्याने कमी होणार नाही. गीते दोन वर्षे अज्ञातवासात की विजनवासात होते, हे माहीत नाही. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधीमंडळ नेतेपदी निवड होत असताना बांद्रा परिसरातील एका हॉटेलमध्ये गीते आले होते. त्यावेळी पवार यांना अतिशय वाकून नम्रपणे पायाला हात लावत केलेल्या आघाडीबद्दल त्यांनी आभार मानले, या घटनेचा मी साक्षीदार आहे.
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याला अनंत गीते हे उत्तर देतील, अशी भाबडी आशा शिवसैनिकांच्या मनात होती. परंतु 2014 आणि 2019 च्या निवडणुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या गीतेंचा स्वाभिमान त्यांच्या पक्षनेतृत्वाबद्दल अशाप्रकारची वक्तव्ये आली, त्यावेळी गळून पडला होता, असा आरोपही तटकरे यांनी केला.