Shravan Food : श्रावणात पचनशक्ती मंदावते, निरोगी आरोग्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ १० गोष्टी! | पुढारी

Shravan Food : श्रावणात पचनशक्ती मंदावते, निरोगी आरोग्यासाठी लक्षात ठेवा 'या' १० गोष्टी!

पुढारी ऑनलाईन: भारतीय संस्कृतीत श्रावणाला अनन्य साधारण महत्व आहे. हिंदू धर्मियांमध्ये या महिन्याला अतिशय पवित्र महिना मानला जातो. या महिन्यापासून अनेक सणांची सुरूवात होते. त्यामुळे या महिन्यात अनेक लोक पूजाअर्चा, व्रतवैकल्ये, देवदर्शन आणि उपवास करतात. खासकरून श्रावणात महिला मोठ्या प्रमाणात उपवास करतात. पण हे उपवास करताना महिलांनी तसेच उपवास करणाऱ्यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी श्रावणात आपण जो आहार घेता तो सकस आणि पोषक असणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे या दिवसात आपल्या शरीरातील बदल लक्षात घेऊन त्यापद्धतीचा आहार घेणे आवश्यक आहे.

श्रावण महिना हा वर्षा ऋतूमध्ये येतो. या ऋतूमध्ये संसर्गजन्य रोगराईचे प्रमाणही वाढते. तसेच या दिवसात आपला जठराग्नीसुद्धा खूप मंदावलेला असतो. या ऋतूत वातदोष वाढत असल्याचे आयुर्वेदातही सांगितले आहे. त्यामुळे पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे या दिवसात स्निग्ध, सात्विक आणि कमी आहार घेणे गरजेचे असते. तुम्हाला जर तुमच्या जीवनात नव्या आहारपद्धतीचा किंवा जीवनशैलीचा अवलंब करण्याची सर्वात योग्य वेळ म्हणजे श्रावण. चला तर जाणून घेऊया श्रावणातील आहारपद्धती…

 

  • रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना एक ग्लास गरम पाणी घ्या. शक्यतो थंड, फ्रीजमधील पाणी पिणे टाळा.
  • श्रावणाच्या उपवासात वारंवार उकळलेल्या दुधाचा चहा, कॉफी किंवा दूध घेण्यापेक्षा गरम पाणी पिणे जास्त योग्य ठरते.
  • सकाळी फ्रेश वातारणात एक तास भरभर चालून या. हलकासा व्यायाम करा.
  • फिरून आल्यानंतर चिमुटभर साखर घातलेला, १ कप लेमन टी घ्या.
  • श्रावणात मुख्यत: सुपाच्य, अल्प, स्निग्ध, गरम आणि पचायला हलका आहार घेणे योग्य ठरते.
  • या दिवसात मुबलक पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या मिळतात. त्यामुळे आहारात याचा समावेश भरपूर प्रमाणात करा.

  • या दिवसात केळी, मोसंबी, संत्री, पेरू, अननस यांसारख्या फळांचा समावेश दैनंदिन आहारात करा.
  • ज्यांच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण १२. ५ पेक्षा कमी आहे. अशांनी आपली शारीरिक स्थिती पाहता कोणताही उपवास करण्याचा अट्टास धरू नये.
  • उपवासाच्या दिवशी जर शेंगदाणा लाडू, साबूदाना खिचडी यांचे सेवन खूप जास्त केले तर शरीरातील आम्लप्रवृत्ती वाढते. आणि ॲसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
  • उपवासाच्या दिवशी फळे, राजगिरा लाडू, शिंगाड्याचे पदार्थ, अक्रोड, काजू, बदाम, खारीक अशी टणक कवच असलेली फळे सेवन करावीत. हे पदार्थ शरीराला भरपूर जीवनसत्वे देतात. त्यामुळे उर्जा मिळते आणि थकवा जाणवत नाही.

 

 

 

Back to top button