

How to Control the Mind Premanand Maharaj: भजन, नामस्मरण किंवा ध्यान करत असताना अनेकदा मन भरकटतं, नको ते विचार येतात, असा अनुभव अनेकांना येतो. याच विषयावर प्रेमानंद महाराजांनी उपाय सांगितला आहे. ते म्हणाले, मनाला करमणूक आणि संसारी सुखाची आकर्षणं असतात. मन मूळातच चंचल आणि अस्थिर असतं. चांगलं-वाईट असा विचार न करता, जिथे सुख वाटतं तिकडे ते धाव घेतं. ही मनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यामुळे भजनाच्या वेळी नको ते विचार येणं काही नवीन नाही.
महाराज सांगतात, आतापर्यंत आपण मनाच्या सांगण्यावर चालत होतो. पण जेव्हा अध्यात्माकडे वळतो, तेव्हा पहिल्यांदाच मनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू होतो. अशावेळी मन अस्थिर होतं. ते पुन्हा जुन्या सवयींकडे ओढण्याचा प्रयत्न करतं. पण जर आपण संयम ठेवला, तर हळूहळू मन आपल्या नियंत्रणात येऊ लागतं.
ते सांगतात, मनाला आपण जसं सांगू तसं ते वागू लागतं. सुरुवातीला ते अस्थिर होईल, त्रास देईल, अस्वस्थ करेल. पण त्या अस्वस्थतेला सहन केलं, तर मन आपल्या नियंत्रणात येतं. तस नाही झालं तर मन आपल्यावर राज्य करू लागतं.
महाराज म्हणतात, “जो स्वतःच्या मनाला शिष्य बनवतो, तोच खरा गुरु. इतरांना शिष्य बनवणं सोपं आहे, पण मनाला नियंत्रणात आणणं हीच खरी साधना आहे.”
मन शांत ठेवण्यासाठी ते काही सोपे उपाय सांगतात, देवाचं नामस्मरण करणं, सत्संगात बसणं आणि नियमित भक्तीचा सराव करणं. सतत रिकामं राहिलं की मन नकारात्मक विचारांकडे झुकतं. त्यामुळे मन चांगल्या कामात, चांगल्या विचारांत आणि भक्तीत गुंतवून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या मते, सातत्याने देवाचं नामस्मरण केल्यास हळूहळू मन शुद्ध होतं, वाईट विचार कमी होतात आणि अंतःकरण शांत होतं.